खोडदच्या तरुणांचा स्तुत्य उपक्रम
नारायणगाव – शिक्षणाचे महत्त्व ओळखून ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या जीवनात ज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी खोडद (ता. जुन्नर) गावातील तरुणांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी रात्र शाळा सुरू केली आहे. अत्यंत गरिबीच्या व हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असूनही ऊसतोड मजुरांची मुले रात्र शाळेत मोठ्या आनंदाने व उत्साहाने शिक्षण घेत आहे. ऊस मजुरांच्या मुलांसाठी खोडद येथे सुरू असलेल्या रात्र शाळेस जुन्नरच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी कौतुक केले आहे.
दररोज आई-वडिलांबरोबर पहाटे पासून ऊसतोड करण्यासाठी शेतात जायचे, आई-वडिलांना मदत करायची आणि रात्री घरी आल्यानंतर चटणी भाकर खाऊन झोपी जायचे असा दिनक्रम ठरलेला. परंतु खोडद गावच्या काही तरुणांनी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अनेक जणांनी योगदान करून रात्र शाळा सुरू केली असून शिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. आज रात्र शाळेत ऊसतोड मजुरांची मुले हजर राहून शिक्षण घेत आहे.
ऊसतोड मजुरांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी 2018-19मध्ये त्यावेळचे गटशिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू केली. साखर शाळेच्या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, हस्ताक्षर यामध्ये प्रगती झालेली दिसून येते. ऊसतोड कामगारांच्या वस्तीवर जाऊन मुलांच्या शिक्षणासाठी खोडद गावातील अवधूत खरमाळे, सुधीर व सुरेखा फाकटकर यांनी पालकांशी संवाद साधला व मुलांना रात्र शाळेत पाठविण्यासाठी प्रवृत्त केले.
अशी सुरू झाली रात्रशाळा
रात्र शाळेसाठी बाबाजी थोरात यांनी जागा व वीज उपलब्ध करून दिली तर किरण गायकवाड, आदित्य चौधरी, ऋषिकेश हांडे, निलेश गुगळे, सीताराम थोरात, धनंजय थोरात, तुषार आंधळे, मिलिंद घुले, संतोष काळे, आकाश चौधरी यांनी फळा, वह्या पेन आदी आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. तर विनीत थोरात व तेजस खंदारे यांनी मुलांना शिकविण्याची जबाबदारी स्वीकारली.
शिक्षक मुलांच्या मानधनाची जबाबदारी मूळचे खोडदचे; परंतु पुणे येथे रहिवासी असलेल्या मित्रांनी घेतली आहे. जिल्हा परिषद शाळा आणि महात्मा फुले विद्यालयाने विद्यार्थ्यांना पुस्तके दिली आहेत. रात्र शाळेत इयत्ता 2री ते 9वी इयत्तेत एकूण 35 विद्यार्थी शिक्षण घेत असून विद्यार्थ्यांकडून अंक गणित लिहून घेणे, वाचून घेणे, पाढे लिहिणे व पाठांतर करून घेणे, पाठ वाचून घेणे यावर भर दिला जात आहे.