पुणे – शहरातील वाढती कोंडी कमी करण्यासाठी जड वाहनांना शहरात दिवसा प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यासह परराज्यातून येणारे ट्रक, कंटेनर यांना थांबण्यासाठी महामार्गावर ट्रक टर्मिनल उभारण्यात यावे, अशी मागणी राज्य वाहन चालक मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी केली आहे. टर्मिनलमुळे सर्व ट्रक एकाच ठिकाणी पार्किंग होतील आणि महामार्गावर कोंडीही होणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. शहरातील कोंडी सोडवण्यासाठी पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मागणी पुढे आली आहे. कंपन्या, शोरूम यासह अन्य वस्तू भरून आलेले ट्रक, ट्रेलर, कंटेनर हे राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात.
तर बहुतांश वाहने ही परराज्यांतून येत असतात. त्यामुळे त्यांना शहरातील माहिती फारशी नसते. त्यामुळे हे ट्रकचालक रस्त्याच्या कडेला, हाॅटेल किंवा पेट्रोल पंपावर वाहने पार्क करतात. मात्र, ज्यावेळी शहरात जड वाहनांना बंदी असताना राज्यासह परराज्यांतून येणाऱ्या ट्रक, कंटेनरची संख्या अधिक असते.
त्यामुळे ही हाॅटेल, पेट्रोलपंपावरील जागा पुरेशी नसून, सर्व वाहने महामार्गांलगत पार्किंग होतील आणि पर्यायाने शहरातील कोंडी सुटून महामार्गावर वाहतूक कोंडी वाढेल. त्यामुळे ही सर्व ट्रक, कंटेनर एकाच ठिकाणी पार्किंग झाले तर कोंडी होणार नाही आणि पोलिसांचा त्रासही कमी होईल. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी ट्रक टर्मिनल उभारण्याची मागणी समोर आली आहे.
जुन्या जकातनाक्यांची जागा वापरावी
मुंबई, सातारा, नाशिक, नगर, सोलापूर, सासवड याप्रमुख महामार्गावरून जड वाहने शहरात प्रवेश करतात. दिवसभर शहरात या वाहनांना प्रवेश बंदी असल्यामुळे ही सर्व वाहने जागा मिळेल, तिथे वाहने पार्किंग होतात. तेच प्रत्येक महामार्गावर शहराबाहेर जुने जकात नाक्यांची जागा उपलब्ध आहे.
तेथे ट्रक टर्मिनल तयार झाले, तर अस्ताव्यस्त पार्किंग होणारे ट्रक व्यवस्थित पार्किंग होऊ शकतात. शिंदेवाडी, औंध, वाघोली, होळकरवाडी, फुरसुंगी, भेकराईनगर, बालेवाडी, भोसरी, फुगेवाडी याठिकाणी जुने जकातनाके आहेत.
“मागील पंधरा ते वीस वर्षांपासून शहराच्या बाहेर महामार्गावर ट्रक टर्मिनल उभारण्याची मागणी संघटनेकडून केली जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शंभर एकरमध्ये ट्रक टर्मिनल उभारण्यात आले. तसेच पुणे शहराच्या बाहेरही ट्रक टर्मिनल उभारावे. आरक्षित असलेली जागाही उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून राज्यासह परराज्यातून येणाऱ्या ट्रकचालकांना दिलासा मिळेल. त्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी आरटीओ, एनएचएआय, पोलीस यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा.” – बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य वाहन चालक मालक व प्रतिनिधी महासंघ