शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले : जलसंकट गडद
शेरखान शेख
शिक्रापूर – केंदूर (ता. शिरूर) येथील काही गावांसह आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांसाठी वरदान ठरलेला थिटेवाडी बंधारा कोरडा पडला असल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात पाणी टंचाई भासू लागल्याने नागरिकांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने तात्काळ टँकर व जनावरांसाठी चारा छावणी सुरू करण्याची मागणी केंदूर परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
केंदूरसह पाबळ, कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी, धामारी, डफळापूर, खैरेनगर, वरुडे, खैरेवाडी, लाखेवाडी, चिंचोली मोराची, शास्ताबाद, हिवरे (मांदळेवाडी) या गावांना व परिसरातील वाड्या वस्त्यांना दरवर्षी सततची पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या दाहक झळा सोसाव्या लागत आहे. पिण्यासाठी व शेतीसाठी हक्काचे पाणी मिळावे या मागणीकडे शासनाचे व राजकीय नेते मंडळीचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा आंदोलन, उपोषण केली आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी आश्वासने दिली. काही बैठका आणि सर्वेक्षण झाले. मात्र, पाणीप्रश्नावर ठोस तोडगा निघाला नाही. निवडणुका झाल्यानंतर अनेकदा बारा गावांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. यावर्षी देखील ऐन उन्हाळ्यात या गावांतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी व चाऱ्यासाठी भटकंती करावी करावी लागत आहे. मात्र, अलीकडील काळातील घडामोडीमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर बारा गावांचा भीषण पाणीप्रश्न पुन्हा पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
शिरुर तालुक्यातील बारा गावांचे गटाचे तटाचे राजकारण बंद, आता फक्त पाणी हाच प्रश्न, पाणी हीच पार्टी आणि पाणीप्रश्न हाच प्रमुख पक्ष, असे म्हणत जोपर्यंत दुष्काळग्रस्त बारा गावांना शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलनं करण्याचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा यापूर्वीच निर्णय घेतला होता, त्यासाठी बारा गाव पाणी हक्क संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असताना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू लागली असताना पाणी हक्क संघर्ष समिती शांत का, असा सवाल शेतकरी करीत आहे.