राजगुरूनगर -खेड तालुक्यातील 91 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 423 एकूण हरकती दाखल झाल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.
तालुक्यातील 91 ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार याद्या निश्चित करून 1 डिसेंबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर सोमवार (दि. 7) पर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. या प्राप्त हरकती संबंधित मंडल अधिकाऱ्यांकडे देऊन हरकतींबाबत गावात जाऊन शहानिशा करण्यात येऊन हरकतदार आणि मंडलाधिकारी याबाबत आलेल्या हरकतीवर जागेवरच निराकारण केले जाणार आहे. मंगळवारी (दि. 8) तालुक्यातील 162 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती झाल्यामुळे खऱ्या अर्थाने करोनाच्या प्रादुर्भाव असताना रणधुमाळीना वेग येऊ लागला आहे.
युती सरकारच्या काळात ग्रामपंचायतीचे सरपंच लोकनियुक्त करण्यात आले होते. महाआघाडी सरकारने हा निर्णय बदलून सदस्यांच्या नियुक्तीतून सरपंचपदी विराजमान होण्याचा निर्णय झाल्याने पुन्हा एकदा पॅनलचे वारे गावात वाहू लागणार आहे. यातूनच आता गटबाजीला उधाण येणार आहे.
मंडलनिहाय हरकती
राजगुरुनगर55
आळंदी127
चाकण72
कडूस39
कनेरसर82
पाईट18
पिंपळगाव12
कुडे18
एकूण423