नीरा देवघरमध्ये 36 टक्के ः भाटघरला गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मा पाणीसाठा
भोर – नीरा देवघर धरणातील पाणीसाठा 36 टक्के, तर भाटघर धरणात 20 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. भाटघर धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाल्यामुळे पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असून, सध्या स्थानिक नागरिक आणि पालखी सोहळ्यासाठी पिण्यासाठी 20 टक्के पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे.
भाटघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे सद्यःस्थितीत भाटघर धरणात केवळ 20 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा निम्म्याने कमी आहे. या दोन्ही धरणांच्या साखळीतील वीर धरणात 45.58 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
सध्या तालुक्यात उन्हाचा कडाका वाढल्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, सध्या भाटघर धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. गेल्या वर्षी 6 मे च्या दरम्यान भाटघर धरणात 44 टक्के पाणीसाठा होता. तालुक्यातील नीरा देवघर धरणात मात्र गेल्यावर्षी एवढाच 38.38 टक्के पाणीसाठा आहे. भाटघर धरण 12 ऑगस्ट आणि नीरा देवघर धरण 13 ऑगस्टला शंभर टक्के भरले होते.
अनेक गावात दुष्काळाची शक्यता
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे, त्यामुळे अनेक गावांत दुष्काळी स्थिती येऊ शकते. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. सध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये साडेअकरा टीएमसी पाणीसाठा असून जिल्ह्यातील अन्य धरणांमध्ये पावणे अकरा टीएमसी साठा उपलब्ध आहे.
पाण्याच्या अधिक वापराने पाणीसाठा घटला
भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे धरणाच्या पाण्यातुन असलेल्या अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना बंद पडू लागल्या आहेत. धरणांमधील पाणी सोडण्यासाठी कालवा समिती स्थापन केलेली आहे; परंतु भाटघर धरणातील पाणी सोडणे बंद केले आहे. उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने भाटघर व नीरा देवघर धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. यंदा काही वर्षांच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा होता. मात्र, पाण्याचा वापर जादा झाल्याने दोन्ही धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.
वीजनिर्मितीसाठी विसर्ग
यावर्षी भाटघर धरणातून 1 जानेवारीपासून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली. सद्यःस्थितीत भाटघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून 1 हजार 876 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नीरा- देवघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून 786 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.