सात धरणांमधून आवर्तन सुरू : साठा घटला
धरणांमध्ये 100.91 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध
उन्हाळ्यात आणखी एक ते दोन आवर्तने सोडण्याची शक्यता
रमेश जाधव
रांजणी – यंदा उष्णतेच्या झळा तीव्र झाल्याने धरणांमधील पाण्याची मागणी वाढली आहे. अर्थात गेल्या एक ते दीड महिन्यापासून पुणे जिल्ह्यातील धरणांमधून टप्याटप्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील धरणांमधून सुमारे 116 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. मात्र, अद्यापही धरणांमध्ये 100.91 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.येत्या काही दिवसात धरणांमधील पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने धरणांमधील पाणी पातळी वेगाने कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चालू वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आंबेगाव, शिरूर, दौंड, बारामती, पुरंदर, खेड तालुक्यातील शेतीसाठी धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यातील सात धरणांमधून पाण्याचीआवर्तने सुरू आहेत. जलसंपदा विभागाकडून अजून एक ते दोन आवर्तने दिली जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सर्वात मोठे समजल्या जाणऱ्या उजनी धरणासह लहान-मोठी अशी एकूण पाच धरणे आहेत. त्यामधील उपयुक्त पाणीसाठा क्षमता 216.84 टीएमसी आहे. पाण्याचा वापर शेतीसह पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांना पिण्यासाठी होतो.
कुकडी प्रकल्पाअंतर्गत असलेल्या पिंपळगाव जोगे धरणातून डाव्या कालव्याला 190 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर येडगाव 1400 क्युसेकने 550, घोड 527, तर उजव्या कालव्याला डिंभे 210, खडकवासला 1150 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय माणिकडोह धरणातून 600 क्युसेक आणि चिल्हेवाडी धरणातून 149 सांडव्याला पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
– प्रशांत कडुसकर, कार्यकारी अभियंता, विभाग-1, नारायणगाव पाटबंधारे
अतिउपसा झाल्याने पाणीटंचाईच्या झळा
गेल्यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे राज्यातील प्रकल्पांमध्ये पाणी भरपूर प्रमाणात आले होते, तसेच भूजल पातळीत वाढ होऊन विहिरींना आणि बोरवेलला पाणी आले; परंतु काही भागात पाण्याचा अतिउपसा होत असल्यामुळे फेब्रुवारीपासूनच काही गावांमध्ये पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या. तर काही गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची वस्तुस्थिती आहे.