पुणे – खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव ही चारही धरणे 100 टक्के भरली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे पानशेत व वरसगाव धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. या दोन्ही धरणातून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणात जमा होते. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. खडकवासला धरणातून रात्री आठ वाजता सुमारे 12 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे.
दहीहंडी निमित्त शहरात गर्दी झाली असून नागरिकांनी आपली वाहने नदीपात्रात पार्किंग केली आहेत. आता धरणातून विसर्ग वाढविण्यात आल्याने ही वाहने पाण्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीपात्रातील वाहने काढून घेण्याचे आवाहन केले आहे.
सध्यस्थितीत खडकवासला धरणातून 6 हजार 800 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आता त्यामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये, नदीपात्रात वाहने अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
– यंत्रणा अलार्टवर
दरम्यान, 12 हजार क्यूसेक पाणी सोडण्यात येणार असल्याने महापालिकेने तातडीनं या भागात धोक्याचा इशारा देण्यासाठी कर्मचारी तैनात केले आहेत. या शिवाय अनेक जण या ठिकाणी वाहने लावून इतर भागात गेलेले असल्याने, दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पालिकेकडून नदीतून वाहने काढून घेण्याचा इशारा देण्यात येणार असल्याचे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनूने यांनी सांगितले.