पुणे – विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, नोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत. यासाठी त्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना दिले.
राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कुलगुरूंची संयुक्त बैठक झाली. यावेळी उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्यपाल यांचे सचिव श्वेता सिंघल, विशेष सचिव सक्सेना, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, अवर सचिव विकास कुलकर्णी यांच्यासह सर्व विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते.
महाविद्यालयांनी एकत्रित येऊन क्लस्टर युनिव्हर्सिटी बनविण्याचा प्रयत्न करावा, असे सांगून राज्यपाल बैस म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासन अग्रेसर आहे. प्रत्येक कुलगुरूंनी विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर अहवाल पाठवावा. कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि व्यवसायाभिमुख शिक्षणावर अधिक भर देऊन रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे.
तसेच, प्रत्येक कुलगुरूंनी ग्रामीण भागातील दहा गावे दत्तक घेऊन त्यांचा सामाजिक विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. महाविद्यालय परिसर हा नशामुक्त ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून निकाल वेळेत जाहीर करण्यचे सूचित केले आहे.