पुणे – करोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर शासनाने परवानगी दिल्यावर व शाळा सुरू झाल्यानंतर इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा घ्यावी लागणार आहे. यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे.
दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत घेण्यात येते. यंदा करोनामुळे परीक्षा लांबणीवर टाकत ती 23 मे रोजी घेण्याचे नियोजन होते. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने ती आणखी पुढे ढकलली.
शासनाने दहावी, बारावीसह सर्व शालेय परीक्षा रद्द करण्याचा पूर्वीच निर्णय घेतलेला आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना जास्त धोका पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे 14 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार असले तरी शाळा प्रत्यक्षात लगेच सुरू होण्याची शक्यता कमी आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी साडेलाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केली आहे.
परीक्षा परिषदेने परीक्षेसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. प्रश्नपत्रिका व ओएमआर शीटची छपाई, परीक्षा केंद्र निश्चिती, हॉल तिकीट याची सर्व तयारी केली आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर या परीक्षा घेण्यावर परीक्षा परिषद ठाम आहे. मात्र, त्यासाठी त्यांना शासनाची मान्यता घ्यावीच लागणार आहे.
दरम्यान परीक्षा झालीच तर ती ऑगस्टमध्ये होऊ शकते, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. परीक्षेची तयारी झालेली असताना शासनाकडून मान्यता न मिळाल्यास परीक्षा रद्द झाल्यासही संबंधित एजन्सीला लाखो रुपयांचे बिल अदा करावेच लागणार आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे कधीना कधी परीक्षा घेणेच सोयीचे ठरणार आहे.