मांजरी खुर्द(ता.हवेली) – येथील अण्णासाहेब मगर विद्यालयातील एकाच बाकावर बसलेले आणि भविष्याची वाटचाल करताना आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले शालेय जीवनातील सवंगडी स्नेहसंमेलन मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल पंचवीस वर्षांनी एकत्र आले. शिक्षकांप्रती असलेली आदरयुक्त भीती अद्यापही चेहऱ्यावर कायम ठेवत उत्साह, आनंद आणि कौतुकाची भावना मनात ठेवत अण्णासाहेब मगर विद्यालय सन १९९७-९८ च्या दहावीच्या बॅचच्या मैत्रिचा रौप्य महोत्सव रंगला.
सन १९९७-९८ मधील माजी विद्यार्थी आणि शिक्षकांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही शिक्षक आज दुर्दैवाने हयात नाहीत त्यांची आठवण काढून सर्व ग्रुपतर्फ़े त्यांना विनम्र श्रध्दांजली वाहण्यात आली. मेळाव्यादरम्यान विद्यार्थ्यांच्या निमंत्रणास मान देत तत्कालीन शिक्षक शामकुमार वेदपाठक,छाया वेदपाठक,विजय उंद्रे,पांडुरंग शेंडे, शब्बीर मुजावर, कलाकार सोनकांबळे, मोतीराम जाधवर, विठ्ठल ढमे, सुनिल कामठे व शिक्षकेतर कर्मचारी बाळासाहेब उंद्रे आदिंनी उपस्थिती लावली.यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित शिक्षकांचा सन्मान केला.विद्या लवांडे- उंद्रे, रुपाली कदम-साकोरे, उज्वला झांबरे- किंडरे ,किशोर उंद्रे,संतोष मुरकुटे, जगदीश उंद्रे,शिवदीप उंद्रे,अमोल उंद्रे,बाळासाहेब जाधव,अतुल थोरात आदिंसह माजी विध्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेत हा स्नेहमेळावा घडवून आणला व तो यशस्वी केला.
विषेशत: आजकालची जरा जास्तच वास्तववादी जीवन जगणारी नवी पिढी पाहिली की हे संस्कार, हे प्रेम आणि ही अत्मीयता प्रकर्षाने जाणवते त्याच बरोबर ती लुप्त होत चालली आहे, याचे दु:ख पण होते. कधी काळी आपण सर्वजण एका घरात 20-25 भावंडं आणि सर्व वडिलधारी मंडळी बिनदिक्कत एकत्र रहायचो. पण आज आपलीच पुढची पिढी एकमेकांना धड नीट ओळखत पण नाही हे दुर्दैवच म्हणायचं.अशी भावना यावेळी उपस्थित शिक्षक तसेच माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
अनेक वर्षांनी पुन्हा एकदा एक संपूर्ण दिवस आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत घालवायला मिळाल्यामुळे सर्वच जण खूप आनंदात होते. याच सुवर्णक्षणांची आठवण मनात साठवून आणि यापुढे न चुकता वेळ मिळेल तेव्हा वरचे वर भेटायचे आश्वासन एकमेकांना यावेळी देऊन शेवटी सर्वांनी निरोप घेतला.