Pakistan Election 2024 – पाकिस्तानच्या बहुप्रतिक्षित सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून कोणत्याच राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी सर्व पक्षांनी आघाडी करण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यासाठी लागलेल्या उशीरामुळे या मतमोजणीमध्ये गैरप्रकार झाले असल्याची चर्चा होते आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने आंदोलनाची तयारी देखील सुरू केली आहे. तर पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझ गटाला पाकिस्तानच्या लष्कराने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
मतदानाच्या निकालांचे कल काल स्पष्ट झाले होते. त्यानुसार पाकिस्तानच्या निवडणुकीमध्ये पीटीआय पक्षाचे समर्थन असलेले अपक्ष उमेदवार सर्वाधिक जागांवर विजयी झाले आहेत. एकूण २६६ सदस्य असलेल्या संसदेत १०१ अपक्ष निवडून आले आहेत. तर त्यापाठोपाठ ३ वेळा पंतप्रधान राहिलेल्या नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगृनवाझ गटाचे उमेदवार ७५ जागांवर विजयी झाले आहेत.
तांत्रिकदृष्ट्या पीएमएल-एन हा या निवडणुकीत संसदेतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुट्टो झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला ५४ जागा तर कराचीतील मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट पाकिस्तानला १७ जागा मिळाल्या आहेत. अन्य छोट्या पक्षांना उर्वरित १२ जागा मिळाल्या आहेत.
इम्रान खान यांना अविश्वास ठरावाच्या आधारे पंतप्रधानपदावरून हटवताना जी आघाडी केली गेली, त्याच्या सूत्राच्या आधारे पीएमएल-एन पक्ष सर्वात मोठा ठरल्यामुळे या पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. नवाझ शरीफ यांनी त्यांचे धाकटे बंधू शेहबाझ शरीफ यांना इतर पक्षांशी चर्चा करण्यास सांगितले आहे.
त्यानुसार शेहबाझ शरीफ यांनी पीपीपीच्या वरिष्ठ नेत्यांशी यापूर्वीच चर्चा केली आहे. तसेच खालिद मकबूल सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील एमक्यूएम-पी च्या शिष्टमंडळाशीही शेहबाझ शरीफ यांची चर्चा झाली आहे. स्वतः नवाझ शरीफ हे देखील एका गटाशी वाटाघाटी करण्यात गुंतले आहेत. मरीयम नवाझ आणि पीएमएल-एन पक्षाचे अन्य नेतेही या वाटाघाटींमध्ये लक्ष घालत आहेत.
आपला पक्ष पीएमएल-एन बरोबर आघाडी करण्यास अनुकूल आहे, असे एमएक्यूएम- पी चे नेते हैदर रिझवी यांनी मतदानापूर्वीच्या मुलाखतीत म्हटले होते. म्हमूनच या दोन्ही पक्षांनी कराचीमध्ये एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले नव्हते. मात्र निवडणुकीत पीएमएल-एन ची पिछेहाट होऊ लागल्यावर एमएक्यूएन-पी ने सावध भूमिका घेतली होती. मात्र इम्रान खान यांना हटवण्यासाठी एकत्र आलेले पक्ष पुन्हा एकदा पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटच्या नव्या समिकरणाने आता पुन्हा एकत्र आणले जाऊ लागले आहेत. या नव्या आघाडीला आता पीडीएम २.० नावाने संबोधले जाऊ लागले आहे.
दरम्यान, पीटीआयचे नेते गोहर खान यांनीही दावा केला आहे की त्यांचा पक्ष सरकार स्थापन करेल, परंतु विश्लेषकांच्या मते ते शक्य झाले नाही. पीएमएल-एन किंवा पीपीपी सारख्या प्रमुख राजकीय पक्षांसोबत युती केल्याशिवाय पीटीआय सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नाही कारण त्यांच्याकडे संसदेच्या कनिष्ठ सभागृहात बहुमताचा दावा करण्यासाठी आवश्यक संख्या नाही.
सरकार स्थापन करण्यासाठी हवे १३३ सदस्य
संसदेमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला १३३ सदस्यांचे पाठबळ असणे आवश्यक आहे.
एकूण ३३६ सदस्य संख्या असलेल्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी १६९ संख्या आवश्यक असते. या ३३६ सदस्यांमध्ये महिला आणि अल्पसंख्यांकांसाठी राखीव असलेल्या जागांचाही समावेश असतो. या जागांवरील सदस्यांची नियुक्ती नंतर केली जाते.
२६५ पैकी २६४ जागांचे निकाल जाहीर
दिनांक ८ फेब्रुवारीला मतदान झालेल्या २६४ जागांचे निकाल निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. मतदानादरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार आल्यामुळे एका मतदार संघातील निकाल निवडणूक आयोगाने राखून ठेवला आहे. तर एका जागेवरील उमेदवाराचे निधऩ झाल्यामुळे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे.
लष्कराने केले सांघिक सरकारचे आवाहन
लष्कर प्रमुख जनरल असिम मुनीर यांनी देशातील ध्रुवीकरण झालेल्या राजकीय परिस्थितीमध्ये देशातील सर्व लोकशाही शक्तींनी एकत्र येऊन सांघिक सरकार स्थापन करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. इम्रान खान यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नवाझ शरीफ यांना पाठिंबा देण्याची लष्करीची भूमिका यातून स्पष्ट होते.
पीटीआयला घ्याव्या लागतील पक्षांतर्गत निवडणुका
पीटीआयच्या पाठिंब्यावर निवडून आलेले अपक्ष उमेदवार पुन्हा पीटीआय पक्षाला सामील होऊ शकतात. मात्र त्यासाठी पीटीआय पक्षाला स्वतःचे निवडणूक चिन्ह असणे अनिवार्य आहे. निवडणूक आयोगाने पीटीआयचे निवडणूक चिन्ह काढून घेतल्यामुळेच या उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली होती. आता पुन्हा पीटीआयमध्ये सामील होण्यापूर्वी पक्षाला पक्षांतर्गत निवडणुका घ्याव्या लागतील. तरच पक्षाला क्रिकेटची बॅट हे निवडणूक चिन्ह परत मिळू शकेल.