पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष ॲड. फैय्याज शेख यांची मागणी
पुणे प्रतिनिधी – करोनाच्या पार्श्वभूमीवर तंबाखू ,पान आणि गुटखा खाऊन थुंकणे घातक आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करून नष्ट करावा. तंबाखूजन्य पदार्थांना पुढील दोन वर्षे अथवा करोनाचा कायमस्वरूपी नायनाट होईपर्यंत बंदी घालावी, अशी मागणी पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे अध्यक्ष ॲड. फैय्याज शेख यांनी केली आहे.
ॲड. शेख हे पुणे लॉयर्स कंझ्युमर सोसायटीचे संचालकही आहेत. संपूर्ण जगात करोनाच्या संसर्गाने धुमाकूळ घातला आहे. अनेक नागरिकांना याची लागण झाली असून, जगात एक लाखांहून अधिक व्यक्तींचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसात पुण्यातही व्यक्तींचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. भारताची लोकसंख्या जास्त असून, सुदैवाने इतर देशांच्या तुलनेत भारतात करोना संसर्ग कमी वेगाने होत आहे.
लॉकडाऊनमुळे जनता घरात बसली आहे. करोनाचा संसर्ग मुख्य करून थुंकी आणि लाळेतून होतो. देशात तंबाखू, गुटखा खाऊन थुंकणारांची संख्या प्रचंड आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर हे लोक तंबाखू आणि गुटखा खाऊन मोठ्या प्रमाणात थुंकण्याची शक्यता आहे. नकळतपणे त्यातून पुन्हा करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. यासाठी सरकारने त्वरित पाऊल उचलावे. तंबाखूजन्य पदार्थाचा साठा जप्त करावा आणि सार्वजनिक ठिकाणी तंबाखू , पान, गुटखा खाऊन गुटखा खाऊन थुंकणाऱऱ्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ॲड. शेख यांनी केली आहे. तंबाखू बंदी हे केव्हाही समाजहिताची आहे, असेही शेख यांनी म्हटले आहे.