पुणे – शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत 15 हजार पेक्षा जास्त लोकांना “डोळे येणे’ संसर्गाचे बाधा झाली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहराच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण दोन ते तीन पटीने अधिक आहे. दररोज, सुमारे दीड हजार पेक्षा जास्त लोकांना या संसर्गाची बाधा होत आहे. ग्रामीण भागातील बाधित लोकांची संख्या 10 हजारापर्यंत गेली आहे.
जिल्ह्यात आळंदी परिसरातून डोळे येणे संसर्गाची लागण सुरू झाली. ती सर्वत्र पसरते आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्येही बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जि.प. आरोग्य विभागाचय अहवालानुसार पुणे शहरामध्ये 1052 तर पिंपरी चिंचवड मध्ये 3,047 जणांना बाधा झाली. संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत बाधित व्यक्तींपैकी सुमारे 9 हजार जण बरे झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.डोळे येणे हा सौम्य प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग असला तरी देखील याबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. हंकारे म्हणाले.
“डोळे येणे या संसर्ग संदर्भात आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यामध्ये हा इंट्रो व्हायरस आढळलेला आहे. त्यामुळे डोळ्यांना होणारा संसर्ग सौम्य स्वरूपाचा असतो. संसर्ग झालेला रुग्ण पाच ते सहा दिवसांमध्ये पूर्णपणे बरा होतो. मात्र या संसर्गाचा प्रसार वेगाने होत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.” – डॉ.रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी