पुणे – पुणे शहरात यापूर्वी ज्या-ज्या ठिकाणी “बीआरटी’मार्ग करण्यात आले त्याची मोठी दुरवस्था झाल्याचे वास्तव समोर असताना महापालिकेकडून मात्र बीआरटीचा थाट नव्या-नव्या मार्गांवर मांडला जात आहे. जुन्या मार्गांवर बीआरटी बंद पडलेली असताना नवे मार्ग केवळ निधीची उधळपट्टी करण्यासाठी का? असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.महापालिकेकडून राबविण्यात आलेल्या कात्रज-स्वारगेट मार्गासह अन्य ठिकाणच्या बीआरटीची मोठी दुरवस्था झाली आहे.
शहरात सर्वात मोठा प्रकल्प म्हणून गाजावाजा झालेल्या स्वारगेट-हडपसर मार्गावर बीआरटीचे अवशेषही आता शिल्लक राहिलेले नाहीत तर दुसरीकडे नगर रस्त्यावरील बीआरटी स्थानक केवळ नावालाच राहिले आहे. याउलट या मार्गावर बीआरटीमुळे होणारी वाहतूक कोंडी मोठी अडचणीची ठरत असल्याने नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग काढावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. अशा स्थितीत महापालिकेकडून मात्र फसलेल्या बीआरटी योजनेला मोठे आर्थिक बळ दिले जात आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत दिघी ते आळंदी, मुकाई चौक ते भक्ती शक्ती आणि बोपोडी ते वाकडेवाडी असे बीआरटीचे तीन मार्ग तयार केले जाणार आहेत.
यातील बोपोडी ते वाकडेवाडी या मार्गासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. सध्या, हा रस्ता 21 फुटाचा असून तो 42 फूट केला जाणार आहे. यासाठी 85 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. प्रवासाच्या वेळेत बचत, सुरक्षित प्रवास अशा गोंडस नावाखाली मोठ्या प्रमाणात बीआरटीसाठी निधी खर्च केला जात असला तरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. यापूर्वीच्या बीआरटी मार्गाची स्थिती काय आहे, ते उघड आहे. अशाही स्थितीत महापालिकेकडून बीआरटीच्या जुन्या मार्गांची दुरूस्ती अथवा ते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी नव्या मार्गांवर निधी खर्च करण्यात महापालिका प्रशासन धन्यता मानत आहे.
बोपोडी ते वाकडेवाडी या दरम्यान बीआरटी मार्ग सुरू करण्यात येत आहे. यासाठी रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. 21 फुटी रस्ता बीआरटीसाठी 42 फूट केला जाणार आहे. यासाठी 85 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. या मार्गावरील बीआरटीचे काम पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागणार आहे, असे महापालिकेचे पथविभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले.