पुणे – शहरातील रस्त्यांवर बेवारसपणे सोडण्यात आलेल्या वाहनांमुळे रस्त्यांंवर वाहतूक कोंडीसह, वाहनांंखाली कचरा साठून मोठया प्रमाणात अस्वच्छता होत आहे. परिणामी, महापालिकेकडून गेल्या वर्षभरात रस्त्यावरील ५३५ बेवारस वाहने जप्त केली असून, त्यापैकी ५०६ विविध प्रकारच्या वाहनांचा लवकरच लिलाव अतिक्रमण विभागाकडून केला जाणार आहे.
महापालिकेने या पूर्वी २०१८ मध्ये १६ लाख रुपये लिलावातून मिळाले होते. त्यानंतर २०२२ मध्ये ११४६ वाहनांचा लिलाव करण्यात आला त्यातून १ कोटी २३ लाख रुपये इतके उत्पन्न पालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून वाहने रस्त्यावर सोडली जातात. त्यात, अनेकदा नादुरुस्त वाहने, मुदत संपलेली वाहने, चोरीची वाहने रस्त्याच्या कडेला सोडली जातात. ही वाहने अरूंद रस्त्यावर जागांवर वर्षानुवर्षे धूळ खात उभी आहेत. त्यामुळे या वाहनांचा वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळा होत आहे.
तसेच या ठिकाणी साफ सफाई करता येत नसल्याने या भागात दुर्गंधी पसरते, या स्वरुपाच्या तक्रारी येतात. या वाहनांमुळे समस्या वाढत असल्याने महापालिकेकडून ही वाहने जप्त केली जातात. त्यापूर्वी वाहनांवर सर्वात प्रथम नोटीस चिकटविली जाते. या नोटीसनुसार सदर वाहन सात दिवसांच्या आत हलविण्याची मुदत दिली जाते, त्यानंतर हे वाहन जप्त केले जाते. त्यानंतर वाहन मालकाकडून दंड वसूल करून ते वाहन परत केले जाते. साधारणपणे त्यासाठी पाच ते २५ हजार रुपयांचा दंड निश्चित केलेला असला तरी वाहने घेऊन जाण्यास अनेकदा वाहन मालक येत नाहीत. त्यामुळे, महापालिकेकडून अशा वाहनांचा लिलाव केला जातो.
चोरीची, कागदपत्र नसलेली वाहनेच अधिक
गेल्या काही वर्षात महापालिकेने जप्त केलेल्या या वाहनांमध्ये चोरीच्या तसेच कागदपत्रांची माहितीच उपलब्ध नसलेल्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही वाहने जप्त केल्यानंतर महापालिकेकडून त्याची माहिती वाहतूक पोलीस तसेच आरटीओकडे पाठविण्यात येत. त्यानुसार, त्यांचे मालक शोधले जातात. तसेच, वाहने अपघात अथवा इतर गुन्ह्यातील तसेच चोरीची असल्यास त्यांचा लिलाव केला जात नाही.