पुणे – शहरभर खोदलेले रस्ते मुदतीत दुरुस्त करण्यास महापालिकेस अक्षम्य उशीर झाला आहे. त्यामुळे अनलॉकनंतर पुणेकर रस्त्यांच्या दुरवस्थेचा मनस्ताप सहन करत आहेत. त्यात आणखी आठवडाभराची भर पडणार आहे. रस्ते पूर्ववत होण्यास 20 जूनपर्यंत वेळ लागणार आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीची 10 जूनच्या मुदतीची घोषणाही हवेतच विरणार आहे.
लॉकडाऊनची संधी साधत ड्रेनेज आणि बांधकाम विभागाने बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्त्यासह सर्व प्रमुख बाजारपेठांमधील रस्त्यांवर सर्वत्र खोदाई केली. यानंतर रस्ता दुरूस्ती एप्रिल-मेमध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. दोन्ही विभागांनी टप्प्याटप्प्याने खोदाई करून रस्ते दुरुस्त करणे अपेक्षित होते. मात्र, विभागांनी केवळ खोदाईवर भर दिला.
लॉकडाऊनमुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने हे काम अर्धवट राहिले. ते 31 मेपर्यंत पूर्ण झालेच नाही. त्यातच करोना बाधितांची संख्या घटल्याने महापालिकेने 1 जूनपासून अनलॉक प्रक्रिया सुरू केली. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे रस्त्यावरील राडारोडा, खोदाईने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे पालिकेने खोदाई थांबवत 10 जूनपर्यंत रस्ते पूर्ववत करण्याची घोषणा केली. मात्र, घोषणेला आठवडा उलटला, तरीही रस्त्यांची स्थिती जैसे थे आहे. तर, ही कामे पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागांनी आणखी आठवडाभराची मुदत मागितली आहे.
एकत्रित रस्ते दुरुस्तीचा हट्ट
रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे महापालिकेतील प्रशासकीय गोंधळ पुन्हा समोर आला आहे. रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी पथ विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहे. मात्र, आता सुरू असलेल्या ड्रेनेज तसेच पाणीपुरवठा योजनांची कामे झाल्यानंतर ही दुरुस्ती पथ विभागाऐवजी खोदाई करणारा विभागच करणार आहे. त्यामुळे एका रस्त्यावर काम झाल्यानंतर तातडीने रस्ता दुरुस्त करण्याऐवजी एकत्रित रस्ते दुरुस्तीचा हट्ट या विभागांनी केल्याने ही स्थिती उद्भवली आहे.