पुणे – स्वतःची जमीन नसतानाही अन्य शेतकर्यांच्या क्षेत्रावर विमा अर्ज दाखल करुन पीक विम्याची रक्कम लाटण्याचा प्रकार कृषी विभागाने उघडकीस आणला आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने संभाव्य विम्यापोटी मिळणारी ३८ कोटी ५६ लाख रुपयांची रक्कम वाचविण्यास कृषी विभागास यश आले आहे. त्यामुळे एक रुपयांत पीक विमा योजनेत गैरप्रकार करुन बोगस विमा उतरविण्याचे काम करणार्या राज्यातील ११ केंद्र चालकांवर करवाई करीत त्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहे.
यंदाच्या खरिपात सुमारे १ कोटी ७० लाख शेतकर्यांनी सहभाग घेतला. त्यातून ११३ लाख हेक्टरवरील पिकांचे क्षेत्र विमा संरक्षित झाले. राज्य सरकार प्रति अर्जांपोटी सेवा केंद्राना ४० रुपये देते. राज्यात ८ हजार ९१६ विमा प्रस्ताव बनावट भरण्यात आले होते. या प्रस्तावाद्वारे ४८ हजार १९८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला होता.
आता प्रस्तावांची छाननी करण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. शेतकर्यांच्या नावाने बोगस विमा प्रस्ताव ऑनलाईनद्वारे दाखल करुन विमा रक्कम लाटण्याचा प्रयत्न करण्यात काही टोळ्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.