पुणे – बालकांच्या मोफत व सक्तिच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागावरील प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी राज्यातील ७४ हजार ६७८ शाळांनी नोंदणी केली असून ९ लाख ५५ हजार ३६३ एवढया जागाही उपलब्ध झालेल्या आहेत.
आरटीई अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील घटकातील बालकांना मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. यातून नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी पालकांमध्ये स्पर्धा लागलली असते. त्यामुळे पालकांकडुन अर्ज नोंदणीलाही चांगला प्रतिसाद मिळत असतो. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी शाळा नोंदणी प्रक्रिया ६ मार्च पासून सुरु झालेली आहे.
१८ मार्च पर्यंत ही मुदत देण्यात आली होती. त्यानंतर २२ मार्च पर्यंत मुदतवाढही देण्यात आली होती. आरटीई कायद्यात बदल करण्यात आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांची संख्याही वाढली आहे. पुणे जिल्ह्यातील ४ हजार ९५६ शाळांनी नोंदणी केलेली त्यात ७२ हजार ९३४ जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत.
बालकांचे प्रवेश अर्ज भरण्याबाबतची प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. त्याबाबतचे वेळापत्रकही जाहीर झालेले नाही. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेशाचे वेळापत्रक लवकर जाहीर करुन त्याची अंमलबजावणीही सुरु करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येवु लागलेली आहे.
त्यातच राज्य शासनाने आरटीईची प्रवेश प्रक्रिया राबविलेल्या शाळांची शुल्क प्रतिपुर्तीची रक्कम थकित ठेवली आहे. यामुळे संबंधित शाळांनी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत नुरुत्साह दाखविण्यास सुरुवात केलेली आहे.