पुणे – गेले दहा दिवस मनोभावे पुणेकरांनी गणपती बाप्पांची सेवा केला. त्यानंतर ऐतिहासिक वारसा आणि जगभरातील भाविकांचे आकर्षण असलेल्या या उत्सवाची सांगता करताना, पुणेकरांनी लाडक्या गणरायाला “पुढच्या वर्षी लवकर या…’ अशी साद घालत ढोल-ताशांच्या गजरात, मनसोक्त बरसलेल्या वरुणराजाच्या साथीने वाजतगाजत जल्लोषात निरोप दिला.
यंदाची विसर्जन मिरवणूक तब्बल 30 तास 25 मिनिटे चालली. मागील वर्षी (2022) विसर्जन मिरवणूक 32 तास चालली. दरम्यान, शहरात यंदाच्या गणेशोत्सवात एकूण 5 लाख 61 हजार 428 मूर्तींचे विसर्जन झाले.
यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे प्रथमच अनंत चतुर्दशीला विसर्जन झाले. मात्र, त्यानंतरही भाविकांचा उत्साह दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होता. तर पोलिसांनीही यंदा “निर्बंध’मुक्त उत्सव साजरा करण्यासोबतच मंडळांना वेळेत मिरवणुका संपवण्याचे आवाहन केले होते.
त्यामुळे मिरवणूक संपेपर्यंत पोलिसांनी कुठेही मंडळांना जबरदस्ती केल्याचे यंदा पाहायला मिळाले नाही. तसेच, शहरात कुठेही मिरवणुकीदरम्यान अनुचित प्रकारही घडला नाही. शहरातील वेगवेगळ्या भागातील विसर्जन मिरवणुकीत एकूण 2,905 मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.
दरम्यान, यंदा गणेशोत्सवासाठी तब्बल 9 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भरपावसातही पोलिसांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. दरवर्षीप्रमाणे मंडईतील लोकमान्य टिळक तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या आरतीने सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.