पुणे – राज्य शासनाने 2021-22 या शैक्षणिक वर्षांसाठी अद्याप इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती निश्चित केलेली नाही. दरम्यान, काही कनिष्ठ महाविद्यालयांनी शासन आदेशाची वाट न पाहता प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचे प्रकार निदर्शनास येऊ लागले आहेत.
कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाने परस्पर प्रवेश प्रक्रिया सुरू करून विद्यार्थी व पालकांची दिशाभूल होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी, असे आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी अधिकाऱ्यांना बजावले आहेत.
राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती या सहा महापालिका क्षेत्रांमध्ये दरवर्षी इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येतात आणि उर्वरित महाराष्ट्रातील अकरावीचे प्रवेश स्थानिक पातळीवरून केले जातात. दरवर्षी अकरावीची प्रवेश प्रक्रिया राज्य मंडळाने दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू करण्यात येत असते.
मात्र, यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली असून अद्याप निकालाबाबतचे अंतर्गत मूल्यमापनाचे निकष निश्चित करण्यात आलेले नाही. मुंबई उच्च न्यायालयातही दहावी परीक्षा रद्द केल्याबाबत जनहित याचिका दाखल झाली आहे. न्यायालयाने परीक्षा रद्द केल्याने राज्य शासनावर कडक ताशेरे ओढले आहेत.
अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतेही धोरण स्पष्ट नाही. मात्र, काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू केली असल्याचे व त्यासाठी गुगल फॉर्मसारख्या सामाजिक माध्यमांद्वारे अर्ज मागविण्याचे प्रकार सुरू केले असल्याचे आढळून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.