रूपरेषा ठरली : नियोजनासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन
पुणे- राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. दहावीचा निकाल 15 जुलैच्या आसपास जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर साधारणपणे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटी घेण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे.
अकरावी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सीईटीबाबत गुरुवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला. करोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावी परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा निर्णय झाला. सीईटीची विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी राज्यशासनाने त्याची रूपरेषा जाहीर केली आहे.
सीईटी आयोजित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येत असून, त्याचे अध्यक्ष शिक्षण आयुक्त असतील. त्यात सदस्य म्हणून राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, एससीईआरटी आणि बालभारतीचे संचालक, परीक्षा परिषदेचे आयुक्त आणि माध्यमिक शिक्षण संचालकांचा समावेश आहे. सीईटी ही सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.
राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी शुल्क नाही
दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे. ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसई, आयएससीई, सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे या केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी शुल्क भरावे लागणार आहे.
सीईटी कोण घेणार?
राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा निर्णय घेतला. मात्र, अद्यापपर्यंत ही सीईटी कोण घेणार आहे, याविषयी अधिक स्पष्टता नाही. शिक्षण आयुक्त यांच्या देखरेखीखाली राज्य शिक्षण मंडळ आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत सीईटी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. पण दोन्हीपैकी कोण सीईटीचे आयोजन करणार यावर अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यावरून अजूनही संभ्रम असल्याचे दिसून येत आहे.
इयत्ता अकरावीला सर्वांना प्रवेश मिळणार
गतवर्षी 32 टक्के अकरावी प्रवेशाच्या जागा रिक्त होत्या. त्यामुळे अकरावीमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यास अडचण येणार नाही. सीईटीच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी दिलेली नाही, त्यांना दहावीच्या मूल्यमापन पद्धतीनुसार प्रवेश दिला जाणार आहे. आता विद्यार्थ्यांनी सीईटीच्या अभ्यासाची तयारी सुरू करावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
अकरावी प्रवेशाच्या सीईटीची ठळक वैशिष्ट्ये
* विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक.
* दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न.
* इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयावर प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न.
* सीईटी 100 गुणांची अन् एकच प्रश्नपत्रिका.
सीईटीचा कालावधी
* दोन तासांचा.
* प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल.
* दहावी निकालानंतर सीईटीसाठी पर्याय दिला जाणार.
* परीक्षा ऑफलाइन होणार.