घरासह हॉटेलमध्ये कांद्याऐवजी भोपळ्याचा वापर : उत्पादकांच्या चेहऱ्यावर हसू, ग्राहकांच्या डोळ्यात आसू
काऱ्हाटी – बारामती तालुक्यात उन्हाळी कांद्याचे उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतो. मात्र, याच कांदा उत्पादन क्षेत्रातील काऱ्हाटी परिसरात जुन्या कांद्याचा संपलेला साठा, वाढलेली मागणी, त्या तुलनेत नव्या कांद्याची पावसामुळे घटलेली आवक, तसेच उपलब्ध कांद्याची खराब झालेली प्रत यामुळे कांद्याची आवक घटली आहे. परिणामी, किरकोळ बाजारात एका किलोसाठी कांद्याचे दर 90 ते 100 रुपयांपर्यंत पोहोचले. त्यामुळे हॉटेल व घरामध्ये जेवणावेळी वापरण्यात येणारा कांदा गायब झाला असून, त्याची जागा आता भोपळ्याने घेतली असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात पडून राहणारा भोपळ्याचाही भाव चांगलाच वधारला आहे.
बारामती तालुक्यात कांद्याची मागणी वाढत असून, तो कमी प्रमाणात असल्याने दिवसेंदिवस त्याच्या भावात वाढ होत आहे. मागील आठवड्यात 80 रुपये किलो असलेला कांदा या आठवड्यात 100 ते 150 रुपये प्रतिकिलो झाला आहे, त्यामुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. कांद्याने अक्षरशा डोळ्यात पाणी आणले आहे.
खाद्यपदार्थात बटाट्याच्या बरोबरीत वापर होणारा कांदा महागल्याने नागरिक त्याला पर्याय शोधत आहे. सकाळचा नाष्टा करण्यासाठी सगळीकडे हात गाड्यावर भजे-पाव खाण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते. या गाड्यांवर कांदाभजी खाणाऱ्यांची संख्या मोठी असते. अनेकांनी कांद्याऐवजी कोबी, बटाटे, तसेच हिरव्या भाज्या वापरणे सुरू केले आहे. कांद्याने मात्र भजे खाणारी व त्यांची विक्री करणाऱ्यांची पंचाईत केली आहे, त्यामुळे त्यांच्या मदतीला भोपळा धावून आला आहे.
सध्या तरी कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता नसल्याने आणखी काही दिवस तरी नागरिकांना कांद्याशिवाय जेवण, नाष्टा करावा लागणार आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागणी आणि पुरवठा यांचा मेळ बसत नसल्याने कांद्याच्या भावात वाढ झाली. ज्या शेतकऱ्यांनी जुना कांदा चाळीत साठवून ठेवला होता, त्याला आता चांगला भाव मिळाला. किरकोळ बाजारपेठेत जुन्या कांद्याचा एक किलोचा दर 150 रुपयांपर्यंत गेला आहे. नवीन कांदा 100 रुपये किलो तर छोट्या आकाराच्या कांद्यांची 80 रुपये किलो भावाने विकला
जात आहे.
हॉटेल चालकांचे गणित कोलमडले
कांद्याचा भाव 100 रुपयांपर्यंत गेल्याने हॉटेल चालक, भेळ आणि अंडा भुर्जी विक्रेत्यांचे गणित कोलमडले आहे. अन्य वेळी हॉटेलमध्ये जेवणासोबत कांदा देण्यात येत होता. भाव वाढल्याने आता अनेकांना कांदा देणे बंद केले आहे. त्याऐवजी चिरलेला कोबी, काकडी आणि टॉमेटो देण्यात येते. भेळ आणि अंडा भुर्जीची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे.
कांदा नाही भोपळा
काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढत चालल्याने भजे विक्री करणारे अडचणीत सापडले आहेत. कांद्याऐवजी भोपळ्याचा वापर भज्यांमध्ये करण्यात येत आहे. भज्यात कांदा की भोपळा हे खाणाऱ्यांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. याविषयी ग्राहकाने तक्रार केल्यास भोपळा आरोग्यास फायदेशीर असल्याचे सांगितले जात आहे.
तेजी राहणार कायम
सध्या बाजारपेठेत वाढलेले कांद्याचे भाव आणखी महिनाभर तेजीतच राहतील. नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. गेल्या आठवड्यातही कांद्याचा भाव 80 रुपये किलोपर्यंत होता. मात्र, अपुऱ्या पुरवठ्यामुळे त्यात वाढ झाली असून, किलोला 100 रुपये मोजावे लागत आहे. दरम्यान, संपूर्ण महिनाभर कांद्याचे भावातील तेजी कायम राहणार असून, मकर संक्रांतीनंतर त्याचे भाव उतरतील, अशी शक्यता वर्तवण्यात आहे.