नगर – सन 2014-15 च्या आसपास राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवास करताना मनोरंजन व्हावे या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा पुरविण्यात आली होती. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासाची सेवा देणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र ही सेवा आता बंद पडल्याने प्रवासी संभ्रमात पडले आहेत.
लांब प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही वाय-फाय सुविधा मनोरंजन तसेच माहिती मिळवण्यासाठी सोयीची झाली होती. असा सेवेच्या माध्यमातून प्रवाशांना खाजगी प्रवास वाहतुकीकडून महामंडळाच्या बसेकडे प्रवाशांना आकर्षित करण्याकरिता महामंडळाने उचललेले पाऊल होते.
परिणामी प्रवासी मोठ्या प्रमाणावर बसेसचा लाभ घेत होते. परंतु आता एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत वायफाय ची सेवा दिसून येत नाही. त्यामुळे लालपरी मधील वाय फाय सेवा गेली कुठे, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. दिवसेंदिवस स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना साकार करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेस मध्ये वाय-फाय ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.
राज्यात अनेक ठिकाणी आगारात मोफत वायफायची सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध करून घेण्यात आली होती. एसटीने प्रवास करणारे अनेक प्रवासी इंटरनेटच्या माध्यमातून विविध प्रकारचे ज्ञान घेत होते आणि प्रवासाच्या दरम्यान मनोरंजनसुद्धा करत होते. राज्य परिवहन महामंडळाला वाय-फाय ही सेवा पुरविणाऱ्या कंपनीकडून वाय-फाय सेवा देणाऱ्या यंत्रात काही बिघाड झाल्यास हे यंत्र दुरुस्तीसाठी टेक्नीशियनची नियुक्ती आगारात केल्या जात होती. आता मात्र अनेक गाड्यांमधील वायफायच्या पेटी गायब झालेल्या दिसतात.
बसमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव
हल्ली अनेक प्रवासी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांमधून प्रवास करीत असून स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. पण स्मार्टफोनची बॅटरी प्रवासामध्ये लवकर उतरत असल्यामुळे नव्याने निर्माण करण्यात येत असलेल्या गाड्यांमध्ये मोबाइल चार्जिंगची सोय करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. शिवाय वाय-फाय सेवा पूर्ववत चालू करावी, असे प्रवासी म्हणाले.