लाहोर – पाकिस्तानमध्ये होणार् या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सरकारी यंत्रणांकडून आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे अपहरण केले जात असल्याचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने म्हटले आहे. सरकारी यंत्रणा आणि गुप्तचरांकडून उमेदवारांना उघडपणे पळवून नेले जात आहे. छळले जाते आहे, असे पीटीआय पक्षाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
माजी संसद सदस्य आणि पीटीआय पक्षाच्या पाठिंब्यावरील उमेदवार खयाल अहमद कस्त्रो यांना ककथित गुप्तचरांनी पळवून नेल्याचा आरोपही पक्षाचे सरचिटणीस ओमर आयुब यांनी केला आहे. कास्त्रो यांना जामीन मंजूर झाला होता, तरीही त्यांचे अपहरण केले गेले हे निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाच्या उमेदवारांना धमक्या मिळत आहेत. पक्षाला निवडणूक चिन्ह देखील गमवावे लागले आहे. इम्रान खान आणि पक्षाचे अन्य प्रमुख नेते तुरुंगात आहेत. त्यांना निवडणूक लढवण्यासही परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार् या उमेदवारांना सुरक्षित वाटत नाही.
पीटीआय-समर्थित उमेदवारांना देखील निवडणूक प्रचार करण्यास परवानगी दिली जात नाही कारण पोलिस आणि एजन्सी मतदारसंघात राजकीय हालचाली सुरू करणाऱ्यांना पकडतात, असे ते म्हणाले.