इलेक्ट्रॉनिक मीडिया संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नारायणगाव (पुणे) – पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 50 लाखांची आर्थिक मदत देऊन शहीद म्हणून सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी पुणे जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे अध्यक्ष अतुल परदेशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
वैद्यकीय सेवेतील गलथान कारभार आणि हतबल प्रशासन यामुळेच 42 वर्षीय तरूण व अभ्यासू पत्रकारास आपला जीव गमवावा लागला आहे. जगभर करोनाने थैमान घालत अनेकांचा जीव घेतला. या संपूर्ण घडामोडींचे वार्तांकन करत अनेक पत्रकारांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता बातमीदारी केली आणि यात अनेक पत्रकार हे कोविड पॉझिटिव्ह आढळले.
जीवावर बेतून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना शासनाने कधीच कोणतीच ठोस मदत जाहीर केली नाही किंवा रूग्णालयात राखीव बेड ठेवले नाही. अशा परिस्थितीत अनेक पत्रकारांना आपला जीव गमवावा लागला आहे. भविष्यात अशा घटनांबद्दल राज्यसरकारने गांभीर्याने विचार करायची गरज आहे आणि पत्रकार बांधवाना कोविड योद्धा म्हणून रूग्णालयात बेड आरक्षित करत चांगल्या वैद्यकीय सेवा दिल्या पाहिजे.