शिरूर बाजार समितीने तयार केले “मापाडी’ अॅप
शिरूर (पुणे) – शेतकऱ्यांच्या मालाची आवक, त्याच्या मालाला भेटलेला बाजारभाव, त्याच्या मालाचे योग्य वजन आणि आणि त्याला मिळणारी एकूण रक्कम एका क्लिकमध्ये शेतकऱ्याला त्याच्या अँड्रॉइड मोबाइलवर मिळणार असून यासाठी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मापाडी अँड्रॉइड अॅप सुरू केले असल्याची माहिती शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शंकरराव जांभळकर यांनी दिली.
यामुळे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यापुढील काळात शेतकरी व्यापारी यांच्यात पारदर्शकता आणण्याचा हा प्रयत्न असून डिजिटल ऍप करणारी राज्यातील दुसरी बाजार समिती म्हणून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिरूरचे आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत डिजिटल ऍप सुरू केले आहे. यावेळी संचालक अॅड. वसंतराव कोरेकर, प्रवीण चोरडिया, बंडू जाधव, सचिव अनिल ढोकले उपस्थित होते.
आतापर्यंत मापाडी पावती पुस्तकातून पावती बनवत असल्याने त्यामध्ये खाडाखोड होणे किंवा बाजारभाव स्पष्ट न दिसणे या समस्या आता राहणार नाहीत. एकूण वजनामध्ये पारदर्शकता नव्हती, तसेच बऱ्याच मालासोबत शेतकरी येत नसल्याने त्यांना घरबसल्या त्यांच्या मालाची झालेली आवक आणि त्यांना मिळालेला भाव समजत नसे. आता या “मापाडी’ ऍपद्वारे पावती झाल्यानंतर शेतकऱ्याला लगेच “एसएमएस’द्वारे बाजारभाव, वजन व रक्कम एका क्लिकमध्ये घरबसल्या उपलब्ध होणार आहे. पावतीच्या स्वरूपात ही माहिती मोबाईलवर शेतकऱ्यासाठी उपलब्ध होऊन त्याचा टोकन नंबर त्याबरोबर असणार आहे.
“शेतकऱ्यांना बाजार विषयक सर्व माहिती घर बसल्या त्यांच्या मोबाईलवर मिळणार आहे. तसेच शेतमालाचे वजन अचूक होऊन त्याची माहिती लगेच त्यांना कळणार असून कृषी विषयक सर्व सल्ला घरबसल्या मिळणार आहे. ऍप बनवण्यासाठी संचालक मंडळाने विशेष प्रयत्न केले आहे.
-शंकर जांभळकर, सभापती शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती
या अॅपचा वापर शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवीन मार्केटयार्ड, शिरूर येथील कांदा मार्केट, पिंपळे जगताप येथील उपबाजार, भाजीपाला तरकारी मार्केट तसेच मुख्य यार्ड शिरूर व उपबाजार तळेगाव ढमढेरे येथील भुसार धान्य मार्केट येथे मापाडी व कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. शिरूर येथील शेळी मेंढी बाजार व तळेगाव ढमढेरे येथील शेळी मेंढी बाजार येथे या ऍपचा उपयोग होणार असल्याचे सभापती जांभळकर यांनी सांगितले.