नवी दिल्ली: लॉकडाऊन आणि सध्याच्या एकूणच बिकट आर्थिक परिस्थितीत सुमारे 12 कोटी नोकरदारांचे जीवनमान हालाकिचे बनले असून या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते केंद्र सरकारने संरक्षित केले पाहिजेत, अशी सूचना माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला केली आहे. सरकारने लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांच्या मदतीसाठी त्वरेने एक पॅकेज जाहीर केले पाहिजे, राज्यांनाहीं पुरेशी आर्थिक मदत केली पाहिजे अशी सुचना त्यांनी केली आहे.
आज देशात सर्वत्र स्थलांतरीत मजुरांचीही बिकट अवस्था झाली असून त्यातून सरकारने त्वरीत मार्ग काढण्याची सूचनाही चिदंबरम यांनी केली आहे.
कोठूनच मदत मिळेनाशी झाल्यामुळे खासगी क्षेत्रातील मालक अनेक कामगार आणि कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकत असल्याचे चित्र सगळीकडे दिसते आहे. त्यातून लक्षावधी कामगार व कर्मचाऱ्यांची रोजीरोटीच धोक्यात येणार आहे. अशा लोकांसाठी सरकारने पे चेक प्रोटेक्शन कार्यक्रम राबवण्याची नितांत आवश्यकता आहे. या लोकांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी सरकारने धडाडीने पावले टाकली नाहीत तर हा मोठा वर्ग रस्त्यावर येण्याचा धोका आहे असे ते म्हणाले.