स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना मोठा दिलासा
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागांत अडकलेल्यांना घरी जाण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशामुळे स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, पर्यटक आणि इतरांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थात, करोनाची लक्षण ज्यांच्यात आढळली नाहीत; त्यांनाच प्रवासाची मुभा मिळणार आहे.
देशव्यापी लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने लोक इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. अडकलेल्या लोकांना स्वगृही पाठवण्याच्या दृष्टीने हालचाली व्हाव्यात, अशी मागणी विविध राज्यांकडूनही केली जात होती. त्यापार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. त्यामुळे काही अटींचे पालन करून अडकलेल्या लोकांची घरवापसी शक्य होणार आहे. अडकलेल्यांची परतपाठवणी रस्तामार्गे होणार आहे. त्यासाठी बसगाड्यांचा वापर करावा लागणार आहे. संबंधित बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण करावे लागेल. तसेच, प्रवासावेळी सुरक्षित सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांचे पालन करावे लागेल.
अडकलेल्या लोकांना पाठवण्यासाठी आणि त्यांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया निश्चित करावी लागेल. त्यावरील देखरेखीसाठी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. त्या अधिकाऱ्यांना अडकलेल्या लोकांची नोंदणी करावी लागेल. परतपाठवणी आणि घरवापसीशी संबंधित राज्यांनी एकमेकांशी सल्लामसलत करणे गरजेचे आहे. प्रवासादरम्यान दोन ठिकाणांमध्ये येणाऱ्या इतर राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी अडकलेल्या लोकांना घेऊन जाणाऱ्या बसगाड्यांना जाण्याची परवानगी द्यावी, असे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. स्वगृही जाऊ इच्छिणाऱ्यांची प्रवासाआधी तपासणी केली जाणार आहे.
करोनाची लक्षण नसलेल्यांनाच घराच्या दिशेने प्रवास करता येऊ शकेल. हव्या त्या ठिकाणी पोहचणाऱ्यांची स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून तपासणी होईल. त्यांना शिफारस झालीच तर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवले जाईल. अन्यथा, त्यांचे घरांमध्येच क्वारंटाईन केले जाईल. त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणीही केली जाणार आहे. आपापल्या घरी जाण्याची परवानगी मिळालेल्यांना आरोग्य सेतू ऍपचा वापर करण्यास सांगितले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीवर देखरेख ठेवणे शक्य होईल.