नवी दिल्ली – पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांचे वर्गातील तास आणि अभ्यासक्रमही कमी करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधिन आहे अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज येथे दिली.
आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी ही माहिती देताना म्हटले आहे की सध्याची एकूण स्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा बोजा आणि वर्गातील तास कमी करण्याची मागणी अनेक पालकांनी केली आहे. त्याचा विचार सुरू आहे. या संबंधात पालकांनी व शिक्षण तज्ज्ञांनी त्यांच्या सुचना जरूर पाठवाव्यात असे आवाहनही त्यांनी केले आहे.
निशंक यांनी आज देशभरातील विविध राज्यांच्या शिक्षण सचिवांची बैठक घेतली. त्यात विद्यार्थ्यांचे आरोग्य, करोना सुरक्षा, इत्यादी विषयांवर चर्चा झाली. मार्च महिन्यापासून करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व शिक्षण संस्थां बंद आहेत.
नवीन शैक्षणिक वर्षही यंदा उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सुचना सरकारने विचारार्थ घ्यायचे ठरवले आहे असे सांगण्यात येते. यंदाचे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाले तर उर्वरीत कालावधीत अभ्यासक्रम पुर्ण करणे कठीण होणार आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांवरील ताणही वाढण्याची शक्यता आहे.