प्रकल्पग्रस्तांना नोकर भरतीमध्ये डावलल्याचा आरोप
सुपा – औद्योगिकीरणासाठी अनेक शेतकऱ्यांनी रोजगाराच्या भूमिकेतून शासनाला लाखमोलाच्या जमिनी दिल्या. परंतु एमआयडीसीतर्फे घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरतीत प्रकल्पग्रस्तांना डावलून त्यांची फसवणूक करण्यात आली. तसेच परिसरातील कंत्राटी कामगारांवर अन्यया होत असून, संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केले आहे. शरद पवळे यांनी बुधवारपासून (दि.7) आंदोलन सुरू केले आहे. मात्र दुसऱ्या दिवशीही या आंदोलनाकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने संताप व्यक्त होत आहे.
पारनेर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांकडून स्पेशल राखीव कोठा ठेवून बाहेरून भरती न करता कंपनीकडूनच भरती करून कायम करावे, औद्योगिक वसाहतीच्या व भूमिपुत्रांच्या हितासाठी आंदोलन करणाऱ्या संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी यांना पूर्णपणे संरक्षण मिळावे, अशा विविध मागण्यांसाठी पवळे यांनी उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान आंदोलनादरम्यान शेतकरी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष विजय ठुबे, गोरक्ष कळमकर, राळेगणसिद्धीचे सरपंच लाभेष औटी, पांडुरग गाडीलकर, संजय तरटे, अनिल करपे, विजय ठुबे, गुड्डू झरेकर, दिलीप दिवटे, पांडुरंग कळमकर, बाजीराव तरटे, मानवाधिकार जनसंघटनेचे तालुकाध्यक्ष अविनाश ढोरमले, शिवा सोनवणे, मच्छिंद्र तरटे, माहिती सेवा समितीचे तालुका सचिव सुदाम दरेकर आदींनी सहभाग घेतला.