पुणे -उश्याला असलेली धरणे भरली, नदीला महापूर आला, मात्र गावातच पाऊस नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अजून कोरडेच आहेत. ही परिस्थिती जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड तालुक्यात आहे. त्यामुळे आजही या तालुक्यातील 96 हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी 52 टॅंकर दिवसभर फेऱ्या मारत आहेत.
बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. पुरंदर वगळता बारामती, इंदापूरमध्ये तर निम्म्यापर्यंतही पावसाची सरासरी झाली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई तीव्र आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात दक्षिण भागात जोरदार पाऊस सुरू आहे.
इंदापूरला कोरड्या दुष्काळाची झळ
इंदापूरात 19 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बारामतीमध्ये 16 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पुरंदरमध्ये 7 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. आंबेगाव तालुक्यात 1 गाव आणि 7 वाड्या-वस्त्यांवर एक टॅंकर सुरू आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.