सातारा – ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 16 जणांना दि. 21 डिसेंबरअखेर प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश सातारा तहसीलदारांनी दिले आहेत.
सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 19 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय करणाऱ्या 16 जणांनी सार्वजनिक ठिकाणी वावर करु नये, परिसरात थांबू नये यासाठी सातारा तालुका क्षेत्रातून दि. 17 रोजी रात्री 12 ते दि. 21 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत तहसीलदारांनी हे आदेश दिले आहेत. मतदानादिवशी दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 12 दरम्यान मतदान केल्यानंतर तालुका क्षेत्रात सार्वजनिक वावर करु नये, परिसरात थांबू नये असे आदेश 16 जणांना दिले आहेत.
या 16 जणांमध्ये मालगाव येथील श्रीरंग नारायण आवळे, शंकर जगन्नाथ देशमुख, विक्रम राजेंद्र आवळे, जमीर नजीर मुलाणी, समीर नजीर मुलाणी, फरिदा आयनाज पटेल, आरळे येथील विक्रांत सर्जेराव साळुंखे, साबळेवाडी येथील किरण भीमराव साळुंखे, माळ्याचीवाडी येथील तुषार शंकर कापसे, गणेश बबन कोरडे, कण्हेर येथील सतीश बजरंग वाघमळे, रमेश दिनकर दुदुस्कर, कोंढवली येथील भरत ज्ञानदेव राजे, राजापुरी येथील आनंदा तुकाराम मोरे, देगाव येथील भरत बाबुराव घाडगे, किशोर जयवंत माने यांचा समावेश आहे.