महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांची स्पष्टोक्ती
पुणे –महाराष्ट्रात आता उत्तर प्रदेशप्रमाणे “लव जिहाद’चा कायदा होणे गरजेचे आहे. शहरात 14-15 वर्षीय मुलींना जबरदस्तीने धर्मांतर करायला लावले जात आहे. हे खूप भयंकर आहे. अशा मुलींसाठी व त्यांच्या पालकांना आधार म्हणून कोणताच कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात नाही. यासाठी येणाऱ्या काळात “लव जिहाद’चा कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात यावा, अशी मागणी करणार असल्याचे भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकसभेत आम्ही 48 पैकी 45 जागा नक्कीच जिंकू तसेच विधानसभेत 200 जागा जिंकूच. यात महिलांचे योगदान जास्त असेल. येणाऱ्या निवडणुकीत आमच्या बुथवर 20-25 महिला या नक्कीच असतील, असा विश्वास वाघ यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील मोर्चाविषयी बोलताना वाघ म्हणाल्या की महाराष्ट्रात अनेक मोर्चे आले आणि गेले. जे स्वतः उद्ध्वस्त आहेत, त्यांचे मोर्चे भाजपला काहीच धक्का लावू शकत नाही.
बऱ्याच गोष्टी बऱ्याच नेत्यांच्या तोंडून चुकून बोलल्या जातात. त्यावर माफीही मागितली जाते; परंतु हे सर्वज्ञानी लोक चुकीची माहिती समाजात पसरवत आहेत. आम्ही कामातून आमची ओळख दाखवतो. अशा मोर्चाची आम्हाला गरज नसल्याचे वाघ यांनी सांगितले.