अजित पवार यांचे आवाहन
पुणे (प्रतिनिधी)- कासारसाई (ता. मुळशी) श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय उमेदवारांना केले. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे सर्किट हाऊसवर झालेल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, खेड, हवेली व शिरूर तालुक्यातील नेत्यांच्या झालेल्या बैठकीत निवडणुकीबाबत चर्चा झाली.
या बैठकीस कारखान्याचे चेअरमन नानासाहेब नवले, माजी मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, माजी खासदार अशोकराव मोहोळ, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे, आमदार दिलीप मोहिते, सुनील शेळके, माजी आमदार सुरेश गोरे, ज्ञानेश्वर लांडगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कारखान्याचे व्हाइस चेअरमन बापूसाहेब भेगडे, चंद्रकांत सातकर, माऊली दाभाडे आदी उपस्थित होते.
मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या अपवाद वगळता गेल्या तीस वर्षात कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणूक होण्यासाठी सर्व पक्षांनी अजित पवार यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कारखान्याचे सुमारे 21 हजार सभासद आहेत. संचालक मंडळाच्या या निवडणुकीमध्ये मुळशी व मावळ तालुक्यातून प्रत्येकी 6, खेड-शिरूर-हवेली मधून 4 याप्रमाणे 16 जागा ऊस उत्पादक शेतकरी प्रतिनिधीसाठी व मागास वर्गातील तीन तसेच महिला दोन याप्रमाणे 21 जणांचे संचालक मंडळ राहणार आहे. या बैठकीत अंतिम उमेदवार यादी अजित पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली.