नवी दिल्ली – करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात होणारी सीबीएसई बोर्डाची परिक्षा रद्द करण्यात यावी अशी मागणी कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. ऐन करोना काळात परिक्षा केंद्रांवर होणाऱ्या गर्दी मुळे करोनाचा फैलाव रोखणे अशक्य होणार आहे असे त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाला निशंक यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की केवळ परिक्षांमुळे एखादे केंद्र हॉटस्पॉट ठरले तर त्याची सारी जबाबदारी केंद्र सरकार आणि सीबीएसई बोर्डाची असेल. ऐन करोना काळात परिक्षा घेतल्याने जर कोणी बाधित झाले तर त्याची कायदेशीर जबाबदारी केंद्र सरकार घेणार आहे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. देशात सध्या दररोरज एक लाखांच्यावर करोना बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे अशा वेळी परिक्षा घेणे आम्हाला धोकादायक वाटते अशी भीती असंख्य पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. ही भीती साधार आहे. अशा धोक्याच्या वातारवणात परिक्षा देणे विद्यार्थ्यांसाठीही त्रासाचेच ठरणार आहे. त्यामुळे सरकारने पालक, विद्यार्थी, शिक्षक अशा घटकांशी चर्चा करून यावर उपाययोजना करावी अशी सुचनाही प्रियांकांनी व्यक्त केली आहे.