उमेश सुतार
कराड – शासनाच्या आदेशानुसार राज्यभर कुठेही गावकामगार तलाठी यांनी आपले खासगी कामगार प्रतिनिधी ठेऊ नयेत, अशा सक्त सूचना दिलेल्या असतानाही सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण तालुक्यात मात्र खासगी कामगारच अण्णासाहेबाची भूमिका बजावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांची हाताची घडी तोंडावर बोट असल्याने नागरीकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गावकामगार तलाठी हे गावपातळीवर काम करीत असताना खासगी लोक कामावर ठेवतात. त्या खासगी प्रतिनिधीकडून गावामध्ये व्यक्ती पाहूनच काम केले जाते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना किरकोळ कामासाठी कित्येकदा तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. याप्रकारच्या अनेक तक्रारी वारंवार वरिष्ठ कार्यालयाकडे होत असतात. मात्र वरिष्ठांकडून याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जाते. परिणामी गावातील सर्वसामान्य जनतेला या खासगी कामगारांकडून नाहक त्रास देण्याचा प्रकार घडत असून हे चित्र कराड व पाटण तालुक्यातील बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहे.
शहरी भागापेक्षा विशेषत: ग्रामीण भागातून तलाठ्यांच्या खासगी प्रतिनिधीकडून सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणाऱ्या या वागणुकीमुळे तक्रारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत गेली. वाढत्या तक्रारी त्यातच खासगी प्रतिनिधींवर अवलंबून राहणाऱ्या तलाठी महाशयांची सजामधील वाढलेली गैरहजेरी लक्षात घेत विभागीय स्तरावरुन याची गंभीर दखल घेण्यात आली. कोणत्याही गावकामगार तलाठ्यांनी आपल्या कार्यालयात खासगी प्रतिनिधी ठेऊ नये, म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयांना आदेश देण्यात आले. त्या आदेशाची अंमलबजावणी सर्वत्र होताना दिसत असली तरी याला कराड, पाटण तालुके अपवाद ठरले असल्याचे दिसून येत आहे.
कराड व पाटण या दोन्ही तालुक्यातील बहुतांशी तलाठी कार्यालयांमधून संगणक ऑपरेटर या गोंडस नावाखाली तलाठ्यांनी खासगी कामगार कामाला ठेवल्याचे दिसत आहे. मात्र हे कामगार आपणच अण्णासाहेब असल्याच्या अविर्भात राहत असल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शासनाचे आदेश धाब्यावर बसवून तालुका स्तरावरुन तलाठी, मंडलाधिकाऱ्यांकडून अशा चुकीच्या कामांना पाठबळ का दिले जात आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्हाधिकारी किंवा अप्पर जिल्हाधिकारी यांनी अचानक भेटी देऊन दोषी सापडल्यास कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शासनाचे आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्यांवर कारवाई होणार की नाही? हाही संशोधनाचा विषय आहे.
तालुक्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा
वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार आमच्या कार्यालयाकडून यापूर्वीच सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आलेले आहे. तरीही कोणी आपल्या कार्यक्षेत्रात दुर्लक्ष करित असल्याने तलाठी खासगी कामगार ठेवत असतील तर तलाठी सोडून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचा इशारा कार्यतत्पर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यापूर्वीच दिलेला आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे यापूर्वीच कार्यक्षेत्रातील सर्व सजांमधील तलाठ्यांना सूचना दिलेल्या आहेत. तरीही कोणी खासगी कामगार ठेवत असतील तर अचानक भेटी देणार आहोत. त्यामध्ये दोषी सापडल्यास त्या तलाठ्यावर कुणाच्याही दबावाला बळी न पडता निलंबनाची कारवाई केली जाणार आहे.
उत्तम दिघे प्रांताधिकारी, कराड