वाराणसी – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) वाराणसी या त्यांच्या मतदारसंघात दाखल झाले असून त्यांनी आज कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. दशकानुदशके सुरू असलेला परिवारवाद, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाने उत्तर प्रदेशला मागे ठेवले आहे. अगोदरच्या सरकारांनी या राज्याला आजारी केले आणि येथील युवकांचे भविष्य त्यांच्यापासून हिरावून घेतले अशा शब्दांत त्यांनी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाला लक्ष्य केले.
कॉंग्रेसचे युवराज काशीत आले आणि म्हणाले की काशीचे युवक नशेखोर आहेत. ही कुठली भाषा आहे. मोदीला शिव्या देत देत त्यांनी दोन दशके घालवली. आता ते काशीच्या युवकांवर आपला राग काढत आहेत. ज्यांची स्वत:ची शुध्द हरपली आहे ते आता काशीच्या तरूणांना नशेखोर म्हणत आहेत. कॉंग्रेस पक्ष पूर्णत: हताश झाला आहे असे मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की काशी नगरी आता सजणार आहे. येथे रस्ते होतील, पुल होतील आणि नव्या इमारतीही होतील. काशी भगवान शिवाची नगरी आहे बुध्दाच्या उपदेशांची भूमी आहे. जैन तीर्थंकरांची जन्मभूमी आहे. आदि शंकराचार्यांना येथेच बोध झाला. काशीबाबत पूर्ण माहिती देणाऱ्या दोन पुस्तकांचे आज येथे प्रकाशनही झाले आहे. गेल्या दहा वर्षांत काशी नगरीने विकासाची जी यात्रा केली आहे त्या सगळ्याचा आणि येथील संस्कृतीचा या पुस्तकांमध्ये उल्लेख आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी? ( Rahul Gandhi)
दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात आपल्या भारत जोडो यात्रेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते की उत्तर प्रदेशचे भविष्य मला दारूच्या नशेत रस्त्यात लोळून नाचताना दिसत आहे. त्यांनी यावेळी अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला केवळ श्रीमंतांची गर्दी होती, तेथे कोणी गरिब, दलित, आदिवासी दिसला नाही. त्यांनी (नरेंद्र मोदी) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही तेथे येऊ दिले नाही.