रेडा -सध्या करोना व्हायरसचा संसर्ग वाढत असताना 18 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीस करोना प्रतिबंधक लस देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय देशासाठी अतिशय दिलासादायक व स्वागतार्ह आहे. करोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय योग्यवेळी ऐतिहासिक असा हा जनहिताचा निर्णय घेतला आहे, असे गौरवोद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
पाटील म्हणाले की, सध्या देशातील नागरिकांना संसर्ग होण्याची चिंता असताना (दि.1) मेपासून 18 वर्षावरील प्रत्येकास लस देण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने देशातील जनतेला मोठा आधार देण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दररोज 17 ते 18 तास जनतेच्या हितासाठी काम करीत आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या म्हणण्यानुसार करोनाविरुद्धच्या लढाईसाठी लसीकरण हे शस्त्र आहे. महाराष्ट्रात बाधितांची संख्या वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला लसीकरणाचा महत्त्वाकांक्षी निर्णय हा करोनावर विजय मिळवण्याच्या केंद्र सरकारच्या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.