नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावून देशाला संबोधन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावण्याची ही त्यांची सलग दहावी वेळ आहे. त्यांच्या अगोदर पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मनमोहन सिंह या तीनच पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरुन किमान दहा वेळा तिरंगा फडकावला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांचा या यादीत समावेश होणार आहे. हा मान मिळवणारे ते पहिलेच बिगर काँग्रेसी पंतप्रधान असतील.
दरम्यान, 2014 पासून प्रत्येकवेळी लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी हे काही ना काही महत्त्वाच्या घोषणा करत आले आहेत. यावेळी तर 2024 च्या निवडणुकीआधीचं त्यांचं शेवटचं भाषण असणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने ते कुठली महत्त्वाची घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
लाल किल्ल्यावरच्या भाषणासाठी जनभागीदारी योजनेअंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रातील सामान्य लोकांनाही आमंत्रित करण्याची परंपरा मोदी सरकारने सुरु केली आहे. उद्या असे 1800 आमंत्रित असतील, ज्यात 400 सरपंच, वेगवगेळ्या सरकारी योजनांचे लाभार्थी, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातले 50 कामगार यांचा समावेश असेल. प्रत्येक राज्यातून त्यांच्या पारंपरिक पोषाखात बोलावलेली एकूण 75 जोडपीही या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहेत.
2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी केलेले 94 मिनिटांचे भाषण हे लाल किल्ल्यावरचे आजवरचे सर्वात लांब भाषण होते. आजवरचे सर्वात छोटे भाषण मनमोहन सिंह यांचे 2012 मध्ये 32 मिनिटांचे होते. आता उद्या स्वातंत्र्याच्या अमृतकाल महोत्सवाचा शेवट होत असल्याने आणि निवडणुकांच्या आधीच्या वर्षातलं भाषण असल्याने मोदी काय बोलतात याची उत्सुकता असेल.