कुड्डालोर – तमिळनाडूत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. या योजनेमध्ये घोटाळा करणाऱ्या 16 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीसीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.
आतापर्यंतच्या तपासामध्ये कुड्डालोर, तिरुवन्नामलाई, विल्लुपुरम, सलेम, कल्लाकुरिची या जिल्ह्यांमध्ये कारवाई आली आहे.
या योजनेस अपात्र असलेल्या सुमारे 40 हजार जणांना याचा लाभ देण्यात माहिती समोर आली आहे. हे 40 हजार जण दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ घेत होते.
पंतप्रधान किसान सन्मान निधीयोजनेंतर्गत वर्षातून तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचे वाटप करण्यात येते. मात्र, यामध्ये गरजू शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी अपात्र लोकांनाच मदत केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
या योजनेंतर्गत फसवणूक होत असल्याची माहिती अंदाजे वर्षभरापूर्वी पहिल्यांदा समोर आली होती. कुड्डालोर येथील जिल्हाधिकारी असणाऱ्या चंद्रशेखर सखामुराई यांनी पिलाईयारमेडू गावातील काही शेतकरी या योजनेसाठी पात्र नसतानाही त्यांचे नाव या योजनेचा लाभ घेणाऱ्यांच्या यादीमध्ये असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्यांपैकी अनेकजण हे सलेम जिल्ह्यातील थारामंगलम येथील आहेत. या लोकांनी शेतकरी नसणाऱ्यांनाही आपल्या कम्प्युटर सेंटरच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी अर्ज करण्यास मदत केली.
केवळ सालेम जिल्ह्यामध्ये अशाप्रकारचे 14 हजार बोगस लाभार्थी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर अन्य जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी पाच हजार बोगस लाभार्थी असल्याचे समजते. याशिवाय या प्रकरणामध्ये 51 इतर लोकांचीही ओळख पटवण्यात आली आहे.