Atal Pension Yojana – अटल पेन्शन योजना उत्तम रीतीने तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत किमान आठ टक्के इतका परतावा मिळतो, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. या योजनेवर काँग्रेस पक्षाने केलेली टीका अयोग्य असल्याचा दावा सीतारामन यांनी केला.
एका समाज माध्यमावरील पोस्टमध्ये सितारामन यांनी म्हटले आहे की, जगातील सर्व योजनांचा अभ्यास करून अटल पेन्शन योजना तयार करण्यात आली आहे. या पेन्शन योजनेतून नागरिकाने जर बाहेर पडायचे ठरवले तर त्याला बाहेर पडता येते. अन्यथा त्याचे योजनेतील कॉन्ट्रीब्युशन चालू राहते. ही योजना योग्य पद्धतीने अंमलात येत आहे. या योजनेवरील काँग्रेसचे टीका अयोग्य आहे.
या अगोदर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी या योजनेवर टीका केली. या योजनेची फक्त जाहिरातबाजी केली जात आहे. मात्र या योजनेमुळे नागरिकांना फारसा लाभ होत नाही. हा एक कागदी वाघ आहे असे जयराम रमेश यांनी म्हटले होते.
ही योजना असंघटित वर्गातील कर्मचार्यासाठी आखण्यात आली आहे. अनेकदा या कर्मचार्यांची परवानगीं न घेताच त्यांची नावे या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे तीन पैकी एका कर्मचार्यांने ही योजना कालांतराने सोडली असल्याचा निष्कर्ष काही अहवालात व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर जयराम रमेश यांनी या योजनेवर टीका केली होती.
मात्र सितारामन म्हणाल्या की, जयराम रमेश यांनी वस्तुस्थितीचा अभ्यास न करता सरकारवर टीका केली आहे. कर्मचार्यांना या योजनेमुळे किमान आठ टक्के परतावा मिळतो. जर त्यापेक्षा रक्कम कमी पडली तर केंद्र सरकार यासाठी अनुदान देते. त्यामुळे कर्मचार्यांचा फायदा होतो या योजनेमुळे असंघटित क्षेत्रातील गरीब कर्मचार्यांना त्यांचे हक्काचे पेन्शन मिळते. असे पेन्शन त्यांना मिळू नये अशी काँग्रेसची इच्छा आहे. म्हणून या योजनेवर काँग्रेसकडून टीका केली जात आहे असे सीतारामन यांनी सांगितले.