नवी दिल्ली – देशातील सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेचे पतधोरण तीन ते पाच एप्रिल दरम्यान ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी अर्थमंत्रालयात जाऊन चर्चा केली असल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे या बैठकीला कसलीही विषय पत्रिका नव्हती. त्यामुळे अर्थ मंत्रालय किंवा रिझर्व्ह बँकेकडून या विषयावर कसलेही वक्तव्य जारी करण्यात आले नाही.
रिझर्व्ह बँकेच्या मार्च महिन्यासाठीच्या अभ्यास अहवालात अन्नधान्याच्या किमती अजूनही जास्त पातळीवर असल्यामुळे व्याजदरात कपात करता येत नसल्याचे सुचित करण्यात आले आहे. त्याचबरोबर देशातील आणि परदेशातील एकूण परिस्थिती पाहता नजीकच्या भविष्यात व्याजदर कपातीची शक्यता रिझर्व्ह बँकेकडून फेटाळण्यात आली आहे.
मात्र केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी जूननंतर रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करू शकेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असे म्हटलेले आहे. त्यामुळे जरी व्याजदरात कपात करण्याबाबत चर्चा झाली तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी वर्षाच्या अखेरीस होणार आहे. या पार्श्वभूमीवर दास यांनी सितारामन यांच्याशी चर्चा केली आहे.
रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या माहितीमध्ये विकासदर या सात टक्के होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर पुढील वर्षाचा महागाईचा दर साडेचार टक्के इतका होईल असे सांगितले आहे. गेल्या महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाई 5.09% इतकी होती.
अर्थ मंत्रालयाने एनपीए कमी करण्यासंदर्भात गेल्या काही वर्षांपासून उपाययोजना केलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्थ मंत्रालयाने सोन्याच्या तारणावर दिल्या जात असलेल्या कर्जाचा आढावा घेण्याच्या सूचना सरकारी बँकांना केल्या आहेत. यामुळे आर्थिक शिस्त बाळगली जावी असे अर्थ मंत्रालयाला वाटते. या विषयावरही यावेळी चर्चा केली असू शकते असे विश्लेषकांना वाटते. मात्र निवडणुका जाहीर झाल्यामुळे या सदर्भात अर्थ मंत्रालय किंवा रिझर्व्ह बँकेकडून अधिकृत निवेदन जाहीर केले जाण्याची शक्यता कमी आहे.
सेबीच्या अध्यक्षाबरोबर चर्चा
दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजार नियंत्रक सेबीच्या अध्यक्षा मधाबी पुरी बुच यांच्याशीही चर्चा केली. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक सध्या उच्च पातळीवर आहेत. त्यामुळे निर्देशांकात बरीच अस्थिरता आहे. या विषयावर देश -विदेशात बरीच चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर सीतरामन यांनी बुच यांच्याशी चर्चा केली आहे. निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे अनेकांचे शेअर बाजाराच्या कामकाजाकडे लक्ष आहे.