मुंबई : मराठा आरक्षणावरुन राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यासंदर्भात आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्राच्या कोर्टात असून मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत असी टीका केली होती. त्यावर ‘हुकूमाची पानं मोदींच्या हातात असतील तर तुमची गरजच काय’ असा पलटवार भाजप नेते प्रविण दरेकर यांनी राऊतांवर केला आहे.
प्रविण दरेकर म्हणाले की, ”भाजपला मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची जाणीव आहे. मात्र, महाविकासआघाडी कायम आपल्याला जमत नाही ती गोष्ट केंद्रावर ढकलण्याचे काम करते. संजय राऊत यांना तर रोज उठून मोदी आणि भाजपवर बोलल्याशिवाय चैन पडत नाही.”
मराठा आरक्षणासाठी महाविकासआघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांना पत्र दिले होते. मात्र, त्या माध्यमातून आरक्षण मिळवणे इतके सोपं आहे का?, त्यासाठी प्रस्ताव सादर करावा लागेल. मग राष्ट्रपतींच्या माध्यमातून तो आयोगाकडे पाठवावा लागेल. यासाठी बराच वेळ जाईल. मात्र, ठाकरे सरकार सर्व गोष्टी केंद्रावर ढकलून दिशाभूल करत आहे, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत – खासदार छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेसोबत आम्ही सगळे सहमत आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटले पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत. त्यांनीच ती टाकावी. खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी राज्यातील सर्व महत्वाच्या नेत्यांची भेट घेतली. पण त्यांना खरी भेट ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवी, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.