नवी दिल्ली – दूरदर्शी आर्थिक व्यवस्थापनाच्या माध्यमातून भारताला 2024-25 पर्यंत पाच हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठता येईल, असे मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले आहे. मात्र, जीएसटीत अधिक स्पष्टतेची आवश्यकता असून मागील वर्षांपासून अर्थव्यवस्थेत मंदीचे काही संकेत दिसत आहेत. त्यामुळे जीडीपीतील वाढ कमी झाली आहे, असेही ते म्हणाले.
असोसिएशन ऑफ कॉर्पोरेट ऍडवायजर्स ऍण्ड एक्जिक्युटिव्ह (एसीएई)ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जर अर्थव्यवस्थेचे योग्य पद्धतीने आणि दूरदृष्टीने व्यवस्थापन केले तर 5 हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य प्राप्त केले जाऊ शकते. त्याचबरोबर गुंतवणुकीशिवाय अर्थव्यवस्थेत वाढ होणार नाही.
जीएसटीबाबत मुखर्जी म्हणाले की, जीएसटी लागू झाल्यामुळे अनेक कर संपुष्टात आले. पण याची अंमलबजावणी सुरळितपणे होण्यासाठी यामध्ये सरकारकडून अधिक स्पष्टता आली पाहिजे, असे म्हणत त्यांनी कार्पोरेट क्षेत्रातील गैरव्यवहारावर चिंता व्यक्त केली. मागील काही वर्षांत अशा पद्धतीचे घोटाळे वाढल्याचे ते यावेळी म्हणाले.