मुंबई – वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा झाली. यासभेवेळी प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, अन्यथा तुमचा राजकीय बळी जाईल, असे वक्तव्य केले. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचाही हाच सल्ला होता, असे म्हणत आंबेडकरांच्या वक्तव्याला दुजोरा दिला.
तसेच, आंबेडकर सभेत बोलताना पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस राजकीयदृष्ट्या सर्वात कमकुवत पक्ष आहे. राष्ट्रवादीचे काही नेते भाजपच्या गळाला लागणार आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर जयंत पाटील यांचे नाव आहे. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा नाहीतर तुम्हाला अटक करु, असा अल्टिमेटम जयंत पाटलांना दिला तर ते भाजपमध्ये जायला कधीही तयार होतील, असे वक्तव्य करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडी नेहमी एकत्र असणार, हे विधान करुन जे गुमराह केले जात आहे, त्याकडे उद्धव ठाकरे यांनी लक्ष दिले पाहिजे.
त्यांनी इतिहास तपासावा- राऊत
“प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकदा इतिहास तपासावा. असा कोणताही सल्ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिला नव्हता,’ असा पलटवार ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे.