पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
पिंपरी बाजार पेठेतील वाहतूककोंडी नागरिकांसाठी ठरतेयं डोकेदुखी
पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक व उपनगरीय परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची असलेल्या पिंपरी बाजारपेठेत अस्ताव्यस्त वाहनांच्या पार्किंगमुळे येथून नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. परिसरात पार्किंग लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने बाजार करण्यास आलेल्या नागरिकांना आपली वाहने रस्त्यावरच लावले लागत आहेत. बाजार करण्यासाठी शहरातील विविध भागांतून नागरिक येथे सहकुटुंब खरेदी करण्यासाठी आपल्या वाहनाने येतात. मात्र, येथे आल्यावर पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्याने त्यांना नाइलाजाने रस्त्यावरच पार्किंग करावी लागत आहे. त्यात, वाहतूक पोलिसांकडून नागरिकांच्या गाड्यांना उचलण्यात येते. तसेच येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असल्याने वाहतूक कोंडी, हॉर्नचा कर्णकर्कश आवाज नित्याचीच बाब झाली आहे. यामुळे नागरिकांना आर्थिक फटका व त्याबरोबर नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे येथील झालेली पार्किंगची समस्या मोठी आहे. येथे वारंवार वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकांची डोकेदुखी होत आहे. तेव्हा त्याच्यावर प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
– काशिनाथ बागुल, खराळवाडी, पिंपरी
अवैध पार्किंगचा वाहनांना अडथळा
पिंपरी -पिंपरी स्टेशन परिसरात रस्त्यावर अस्ताव्यस्त पद्धतीने अवैधरित्या केल्या जाणाऱ्या पार्किंगमुळे येथील परिसरात अपात्कालीन परिस्थीतीमध्ये ऍम्बुलन्स किंवा अग्निशामक वाहनांना येण्या-जाण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे भविष्यात येथील परिसरात काही अनुचित प्रकार घडला तर, येथे अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना पोहोचणे अवघड होणार आहे. तरी परिसरातील रस्त्यावर अवैधरित्या होणाऱ्या पार्किंगला लगाम घालण्याची मागणी, नागरिकांतून होत आहे.
– जितेंद्र जुनेजा, पिंपरी रेल्वे स्टेशन
सेवा रस्त्यांची दुरवस्था
वाकड -येथील पुणे-मुंबई महामार्गावरील भुजबळ चौकातील रस्त्यावर खोदकाम केल्याने येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना नहाक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. हिंजवडीकडून येणारी वाहने येथून वळून पुढील मार्गावर मार्गस्थ होतात. मात्र, येथे खोदलेल्या रस्त्यामुळे वाहनांना अपघात होत आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तरी, येथील खोदकाम केलेला रस्ता बुजवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
– बी. एन. राजे, पिंपरी