पुणे – अकल्पनीय कर्तव्यभावना आणि उत्स्फूर्त ऊर्जा यांच्या संगमातून कठोर सामाजिक वास्तवाशी भिडणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा हृद्य सन्मान सोहळा बुधवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात रंगला. दैनिक “प्रभात’चा पहिल्या नारी सन्मान 2020 हा सोहळा मोठ्या दिमाखात व थाटात संपन्न झाला.
नंदिनी जाधव यांचा अल्पपरिचय
अशिक्षित असो वा सुशिक्षित, अंधश्रध्देचा पगडा थोड्याफार प्रमाणात सगळ्यांवर असतोच. कारण श्रध्दा आणि अंधश्रध्दा यातील सीमारेषा तशी पुसटच असते. ती वेळीच दिसली पाहिजे. समजली पाहिजे. आपल्याला समजल्यावर इतरांना जागे केले पाहिजे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत काम केलेल्या नंदिनी जाधव हेच काम करीत आहेत.
बुवाबाजी, करणी, भानामती यांचा अजूनही पगडा आहे. भोंदूबाबांच्या नादी लागून महानगरांतले सुशिक्षितही गंडवले जातात. या कुप्रथांवर नंदिनी जाधव यांनी प्रहार केला. या विरोधातील प्रत्येक मोहिमेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. महिलेला असलेल्या जटा हा तर अत्यंत गंभीर विषय. कारण त्याच्याशी देव आणि देवाच्या नावाने घातली गेलेली भीती ही प्रमुख कारणे. या भीतीमुळे असलेली जट काढण्यास ना महिला धजावतात, ना त्यांचे कुटुंबिय. नंदिनीताईंनी यात लक्ष घातले. भीती नाहीशी केली. त्याकरता समुपदेशन केले. संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे केले.
परिणाम बोलका होता. या अभियानात 154 महिलांची जटामुक्ती झाली. जटामुक्ती झाल्यानंतर महिलांच्या अंगात येणेही बंद झाले. अनेक बुवांचे बिंगही त्यांनी फोडले आणि अनेक संसार वाचवले. या भोंदूंच्या नादी लागून फसवणूक होण्याला पायबंद घातला. प्रबोधनाचा, प्रगतीशीलतेचा वारसा आणि परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रात या प्रथा लाजीरवाण्या होत्या. त्यातून महाराष्ट्राची आणि त्या दुर्दैवी महिलांची मुक्ती करण्याचे हे काम खरेच मोठे.
एखाद्या कुटुंबालाच जातीतून बहिष्कृत करण्याचा अघोरी प्रकारही आपल्या देशात आणि राज्यात घडतोय. काही समाजांत त्याचे प्राबल्य आहे. कुटुंबच्या कुटुंबे या दुष्प्रथेमुळे होरपळली जातात. लग्नाअगोदर मुलीची कौमार्य चाचणी घेण्याची लाजीरवाणी आणि तितकीच धक्कादायक प्रथाही अस्तित्वात आहे. विशेष म्हणजे त्यात काही गैर असल्याची जाणीवही नाही. अशा वातावरणात संबंधित समाजातील तरूणांचेच प्रबोधन करणे आणि त्यांना या प्रथांच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरणा देणे, नव्हे, तर स्वत: सहभागी होण्याचे काम नंदीनीताईंनी केले.
अंधश्रध्दांच्या पगड्याची कितीतरी उदाहरणे आपल्या सभोवती पाहायला मिळतात. कुठेतरी करणी केली म्हणून झाडांना खिळे ठोकलेले असतात, तर कुठे काळ्या बाहुल्याही शिवलेल्या पाहायला मिळतात. घट्ट विळखा बसलेल्या अंधश्रध्दांतून बाहेर काढणे सोपे नसते. त्याकरता प्रचंड धाडस आणि चिकाटी असावी लागते. ते असल्यामुळेच या बाहुल्या काढून चक्क जाळून टाकण्याचे ठोस काम नंदीनीताई करू शकल्या.
बालवयातच मुलींचे विवाह करून जबाबदारीमुक्त होऊ पाहणारे अशिक्षित पालक कमी नाहीत. त्यांचे प्रबोधन करून असले विवाह रोखण्यातही नंदिनीताईंना यश आले आहे. अंधश्रध्देविरुध्दचा लढा कोणा एकट्याचा नाही. तो लगेचच संपणाराही नाही. त्याकरता प्रचंड धैर्य आणि दृढनिश्चयाची आवश्यकता असते. ते नंदिनीताईंकडे आहेच. त्यांच्या या समाज उन्नतीच्या कार्यास प्रभातच्या हार्दीक शुभेच्छा.
जटामुक्तीच्या खंद्या कार्यकर्त्या नंदीनीताई जाधव यांचे गौरवोद्गार; ‘प्रभात’ने कौतुकाची थाप दिली
“चांगल्या कार्याची दखल घेऊन “प्रभात’ने सन्मान करत पाठीवर कौतुकाची थाप दिली. यातून कार्याला आणखी प्रेरणा मिळणार आहे,’ असा विश्वास जटामुक्तीच्या खंद्या कार्यकर्त्या नंदीनीताई जाधव यांनी व्यक्त केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून महिलांचे आंतरिक व वैचारिक सौंदर्य वाढविण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू ठेवले आहे. 165 महिलांचे जटनिर्मूलन केले आहे. महिलांचे समुपदेशन करण्याचे कार्य सतत सुरू आहे. जोगत्यांचेही प्रबोधन केले आहे. अंधश्रद्धेबाबत समाजातील गैरसमज दूर करणे अत्यंत आवश्यक असल्याचे जाधव यांनी नमूद केले.