भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यपूर्ण यशाची मालिकाच सुरू केली आहे. या यशामुळे जगभरातील प्रगत देशांनाही तोंडात बोटं घालण्यास भाग पडत आहे. या यशाच्या माळेमध्ये आणखी एक मणी नुकताच जोडला गेला आहे. शुक्रवारी इस्रोने तब्बल 3,357 किलो वजनाचा शक्तिशाली जीसॅट 30 हा उपग्रह अंतराळ कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केला.
फ्रेंच गुआनाच्या कौरू येथील एरियन स्पेस सेंटरवरून एरियन रॉकेटद्वारे ही मोहीम पार पडली. एरियन रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला भारताचा हा 24 वा उपग्रह आहे. अंतराळ मोहिमांविषयी सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच कुतूहल राहिले आहे. त्याचबरोबर या मोहिमांवर होणाऱ्या खर्चाची देशातील भूकबळी, उपासमारी, कर्ज, दारिद्य्र आदींशी सांगड घालून टीकाही केली जाते. तथापि, या मोहिमांचे अनेक फायदे हे सामान्यांसाठी अदृश्य असतात. किंबहुना, त्यांना याबाबत माहिती नसते.
आज आपण टीव्ही, मोबाइल, इंटरनेट या तंत्रज्ञानाच्या क्रांतीची फळे चाखत आहोत. त्यामधील असंख्य प्रक्रिया सुव्यवस्थितपणे कार्यान्वित होण्यासाठी अनेक उपग्रह पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर अंतराळात कार्यरत असतात. अगदी हवामान अंदाजाचे उदाहरण घेतले तर हे अंदाज मिळणेही उपग्रहांच्या मदतीनेच शक्य होते. 1957 मध्ये तत्कालीन सोव्हिएत रशियाने स्फुटनिक हा जगातील पहिलावहिला उपग्रह अंतराळात सोडला. तेव्हापासून उपग्रह सोडण्याची स्पर्धा सुरू झाली. अंतराळात प्रक्षेपित करण्यात आलेले उपग्रह हे दळणवळण, शैक्षणिक, दूरसंचार, हवामान, शेती आदी अनेक क्षेत्रांसाठी उपकारक ठरत आहेत. आजघडीला एकट्या भारताचे असे 76 उपग्रह अंतराळात भ्रमंती करत आहेत. या उपग्रहांचा वापर लोककल्याणकारी कामांसाठी होतो, तसाच लष्करी वापरही करता येतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर सत्तेचे मोजमाप काही आधारांवर होते.
यामध्ये आर्थिक विकास, त्याचा दर, अण्वस्त्रसज्जता, संरक्षण सज्जता यांबरोबरच अंतराळ संशोधनातील प्रगतीचा समावेश होतो. इस्रोच्या यशस्वी मोहिमांमुळे आज अमेरिका, चीन, इंग्लंड यांसारख्या प्रगत देशांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, हे विसरता येणार नाही. इस्रोने ज्या जीसॅट 30 उपग्रहाचे प्रक्षेपण केले, तो उपग्रह 2005 मध्ये लॉंच केलेल्या इनसॅट 4 ए च्या जागी कार्यरत होणार आहे. जवळपास 15 वर्षे तो भारतासाठी अंतराळात कार्यरत राहणार आहे. या उपग्रहामुळे भारतातील टेलिकम्युनिकेशन सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा होण्यास मदत मिळणार आहे.
विशेषतः सध्या ज्या फाइव्ह-जी तंत्रज्ञानाची चर्चा जगभरात सुरू आहे, त्यादृष्टीने हा उपग्रह अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अलीकडेच भारताच्या दूरसंचार मंत्रालयाने चीनच्या हुवावेला देशात फाइव्ह-जीच्या चाचणीस परवानगी दिली आहे, हे याठिकाणी लक्षात घ्यायला हवे. जीसॅट 30 हे 2020 या नव्या वर्षातील इस्रोचे पहिलेच मिशन होते आणि ते यशस्वी झाले आहे. या उपग्रहावर दोन सोलर पॅनल आणि बॅटरी बसवण्यात आलेली आहे. देशातील संप्रेषणप्रणाली, डीटीएच सेवा आणि मोबाइल नेटवर्कमध्ये आगामी काळात येणारी आधुनिकता आणि सध्याच्या नेटवर्कच्या समस्यांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने हा उपग्रह महत्त्वाचा ठरणार आहे. आज जगभरात संप्रेषण व्यवस्थेमध्ये वेगाने बदल घडत आहेत. त्यामुळे भारतानेही यामध्ये मागे राहणे योग्य ठरणारे नव्हते.
आज देशात मोबाइल आणि डीटीएच सेवांचा झपाट्याने विस्तार होत आहे. या विस्ताराला पूरक ठरण्यासाठी शक्तिशाली उपग्रहाची गरज होती, ती यानिमित्ताने पूर्ण झाली आहे. 15 ऑगस्ट 1969 रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेची (इस्रो) निर्मिती करण्यात आली होती. ज्या देशात कधी काळी सायकल आणि बैलगाडीवरून रॉकेट इकडून तिकडे नेण्यात येत होती, त्या देशाने आज चंद्रावर आणि अंतरिक्षावर कब्जा करण्याची क्षमता प्राप्त केली आहे. इस्रोच्या स्थापनेनंतर 19 एप्रिल 1975 रोजी इस्रोने आर्यभट्ट या स्वदेशी बनावटीच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. सायकलवरून उपग्रहाची वाहतूक सुरू करणाऱ्या देशाने आज अंतरिक्षाच्या क्षेत्रात शक्तिशाली मानण्यात येणाऱ्या पाच देशांच्या पंक्तीत स्थान मिळविले आहे. एक काळ असा होता, जेव्हा भारताचे उपग्रह प्रक्षेपित करण्यास अमेरिकेने नकार दिला होता. आज परिस्थिती बदलली आहे.
आज अमेरिकेसह अनेक देश भारताबरोबर या क्षेत्रात व्यावसायिक करार करण्यास नेहमी उत्सुक असतात. ताज्या मोहिमेच्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, चांद्रयान-2 च्या अपयशामुळे आपले शास्त्रज्ञ खचून गेलेले नाहीत. त्यांनी तर चंद्र आणि मंगळाव्यतिरिक्त अन्य ग्रहांचीही खगोलशास्त्रीय रहस्ये उलगडण्यासाठी योजना तयार केल्या आहेत. भारतीय किंवा मूळ भारतीय वंशाचे तीन अंतराळवीर आतापर्यंत अंतरिक्षात जाऊन आले आहेत. राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले. सोयूज-टी 11 या रशियाच्या यानातून शर्मा अंतरिक्षात गेले होते. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स याही अंतरिक्षात गेल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात 2022 पर्यंत अंतरिक्षात मानव पाठविण्याची घोषणा केली होती.
या योजनेच्या अंमलबजावणीस हिरवा कंदील मिळाला आहे. अंतरिक्षात मानवरहित आणि मानवसंचालित दोन्ही प्रकारची याने पाठविण्यात येतील. पहिल्या टप्प्यात योजनेचे यश तपासण्यासाठी दोन वेळा वेगवेगळी मानवविरहित अंतराळ याने झेपावतील. त्यांच्या यशस्वितेचा आढावा घेऊन मानवयुक्त यान भरारी घेईल. त्याचबरोबर इस्रोचे शास्त्रज्ञ सौर मोहिमेचीही तयारी करीत आहेत. सूर्याच्या कॅरोनाचा अभ्यास करण्यासाठी तसेच पृथ्वीवरील इलेक्ट्रॉनिक संचार क्षेत्रात अडथळे निर्माण करणाऱ्या सौरवादळांची माहिती मिळविण्यासाठी भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेतर्फे आदित्य-1 उपग्रह लवकरच प्रक्षेपित केला जाणार आहे. मंगळाबरोबरच शुक्रावरही इस्रोच्या शास्त्रज्ञांची नजर आहे.
शुक्र ग्रहावर अंतरिक्ष मोहीम आखणे या क्षेत्रातील संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानतात. कारण पृथ्वीपासून खूपच जवळ असूनसुद्धा या ग्रहाविषयी अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे. अर्थात शुक्रावरील मोहीम केवळ ऑर्बिटर पाठविण्यापर्यंतच सीमित असू शकते. आतापर्यंत अमेरिका, रशिया, युरोपीय स्पेस एजन्सी आणि जपान यांनाच शुक्राची मोहीम यशस्वी करणे शक्य झाले आहे. एकंदरीत गेल्या 50 वर्षांत इस्रोने यशस्वितेचे वेगवेगळे विक्रम सातत्याने प्रस्थापित केले आहेत. भारत हा अंतरिक्ष क्षेत्रातील सर्वांत मोठी ताकद ठरण्याचा दिवस आता फार दूर नाही.