– हिमांशू
मस्त थंडी पडू लागली, महाबळेश्वर येथे दवबिंदू गोठल्याच्या बातम्या आल्या, समुद्रकिनारे गजबजल्याचे फोटो छापून आले आणि जुळवाजुळव सुरू केली. करोनाच्या विषाणूची भीती आणि लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कुठेच जाता आलं नाही, याचं शल्य स्वस्थ बसू देईना. दबलेल्या मनानं उसळी घेतली आणि फोनाफोनी सुरू झाली. कुठे जायचं, कुणी-कुणी जायचं, किती दिवसांसाठी जायचं, कसं जायचं, खर्चाचा अंदाज काय वगैरे बाबींवर सुरू झालेल्या चर्चा सोयीच्या तीन दिवसांची निवड करण्यापर्यंत पोहोचल्या. आता तपशील ठरवायची वेळ आली आणि अचानक सगळं बारगळलं. ऐन जानेवारीत चक्क पाऊस सुरू झाला. पुन्हा एकदा सगळे कोमेजून गेले. पण बहुतेकांची चिडचीडच अधिक झाली. आपण कुणावर रागावलो आहोत, हेच आधी कुणाला कळेना.
शेवटी आपण आपल्या नशिबावर रागावलो आहोत, यावर सगळ्यांचं एकमत झालं आणि आमच्या ग्रुपवर पूर्वीच्या आठवणी जागवल्या जाऊ लागल्या. बरोबर सात जूनला पावसाळा सुरू होण्याचे दिवस आम्ही सर्वांनी पाहिलेत. प्रत्येक नक्षत्रानुसार पावसाचे रंग बदलायचे. हा बदल अनुमानित असायचा. आज नोव्हेंबर-डिसेंबरमध्येही आपण बऱ्याच वेळा पंखा लावतो; परंतु काही वर्षांपूर्वी नवरात्रात भल्या पहाटे “फुले घ्या फुले’ची आरोळी ऐकून जेव्हा घराबाहेर यायचो तेव्हा हुडहुडी भरलेली असायची. मकर संक्रांतीनंतर खरोखर थंडी कमी होऊ लागायची आणि रथसप्तमीपर्यंत उन्हाळ्याची चाहूल लागायची.
असं काही बोलायला गेलं तर “नॉस्टेल्जिक’ म्हणून हिणवण्याची हल्ली चढाओढच लागते. पण खरोखर हे फक्त “स्मरणरंजन’ असतं की काहीतरी खुपत असतं, याचाही शोध कधीतरी घ्यावा लागेल. आपण “काय’ गमावलंय आणि “का’ गमावलंय, या प्रश्नांची उत्तरं टाळण्यासाठी “नॉस्टेल्जिया’ची दिमडी किती काळ वाजवणार? बदल घडत असतात आणि त्यांना सामोरं जायचं असतं हे खरं; पण त्या बदलांना विशिष्ट गती असावी लागते. स्वार्थाची गती निसर्गाच्या गतीपेक्षा तीव्र झाली तर आपलं अस्तित्वच पणाला लागू शकेल, हा सारासार विवेक गमवायचंच ठरवलं तर केवळ “नॉस्टेल्जिया’च दिसेल.
जाऊद्या, भूतकाळ सोडून थोडं भविष्यकाळाकडे पाहूया. “तीन-चार दशकांपूर्वी बरोबर सात जूनला पावसाळा सुरू व्हायचा,’ हा पुढच्या पिढीनं इतिहास मानायचा की भूगोल? पिढ्या येतील-जातील; पण सात पिढ्यांचं कमावून ठेवलं तरी निसर्गाची नाराजी अशीच वाढत राहिल्यास ती दूर करण्यासाठी या कमाईचा काही उपयोग होईल का? या प्रश्नांची उत्तर कोण देणार? 2003 मध्ये जन्मलेली ग्रेटा थनबर्ग आजच जगातल्या प्रभावी नेत्यांना प्रश्न विचारू लागलीय. हवामान बदल थांबवण्यासाठी शाळेत संप करू लागलीय. स्वीडनच्या संसदेसमोर बसून अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेऊ लागलीय.
ग्रेटाचे सवंगडी भविष्यात वाढणार आहेत आणि त्यांचे प्रश्नही! अचानक ढग आले, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, कधीही ढग गडगडून अवकाळी पाऊस कोसळू लागला तर हवामान खात्यावर राग काढून आपण मोकळे होतो; पण त्या खात्याचा फक्त अंदाजच चुकलेला असतो. आपलं बरंच काही चुकलेलं असतं, हे मात्र आपल्याला दिसत नाही. हिवाळा आला म्हणून आम्ही काढलेली ट्रिप पावसाळा सुरू झाल्यामुळे कॅन्सल झाली; पण हा “हिवसाळा’ आम्हीच आणला, हेच वास्तव!