कोल्हापूर (प्रतिनिधी) – वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण युद्धपातळीवर प्रयत्न करत असून दोन जिल्ह्यातील मिळून 44 हजार 773, तर आतापर्यंत 1 लाख 11 हजार 467 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याची माहिती महावितरणने दिली आहे. पुरामुळे रोहित्र, खांब, वीजमीटर तसेच अनेक तांत्रिक साहित्य नादुरुस्त झाले असून ते बदलण्यासाठी राज्यभरातून साहित्य घेऊन ट्रक कोल्हापूर-सांगलीच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.
महावितरणचे राज्यभरातील हजारो हात कोल्हापूर व सांगलीच्या मदतीला धावून वीजपुरवठा सुरळीत करणार आहेत. नवीन रोहित्र, खांब, मीटर आदी सहित्याचे अनेक ट्रक कोल्हापूर, सांगलीच्या जवळपास पोहोचले आहेत. वाहिन्यांसाठी लागणारे रिले बोटीच्या साह्याने कोल्हापुरात पोहोचले देखील आहेत. महावितरण प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर काटेकोर नियोजन केल्याने आवश्यक असणारे सर्व साहित्य पूर ओसरण्यापूर्वीच पोहोचणार आहे.
महापुरामुळे दोन जिल्ह्यातील 3 लाखांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खबरदारीपोटी खंडित करावा लागला होता. कालपासून पाणीपातळी संथ गतीने कमी होत आहे. तसा खंडित झालेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याच्या कामानेही वेग घेतला आहे.
कोल्हापूर शहरातील विक्रमनगर भागातील 10 रोहित्र व त्यावरील 1 हजार ग्राहक, शुक्रवार गेट वाहिनीवरील 5 हजार व लक्ष्मीपुरी भागातील 1 हजार 400 अशा 36 रोहित्र व त्यावरील 7 हजार 400 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यास महावितरण शहर विभागाला यश आले. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात 38 हजार व आतापर्यंत 94 हजार 353 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे.
सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर भाग, हिराबाग पाणी पुरवठा योजना, माधवनगर रस्ता तसेच सिव्हील हॉस्पिटल ते शंभर फुटीरोड या भागातील साधारणतः अडीच हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सांगली शहर विभागाने पूर्ववत केला. पाऊस थांबला असला तरी सांगली जिल्ह्यता पुराची पातळी म्हणावी तशी उतरली नाही. त्यामुळे मनुष्यबळ असूनही वीज पुरवठा पूर्ववत करण्यात मर्यादा आल्या. सांगली जिल्ह्यात 17 हजार 114 ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु केला आहे.